दोन दिवसात 60 हून अधिक बळी ः दीड हजारहून अधिक गावात महापुराची स्थिती
गुवाहाटी / वृत्तसंस्था
देशाच्या बहुतांश भागात उष्णतेने कहर केलेला असतानाच दुसरीकडे आसाम त्रिपुरा आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. गेल्या दोन दिवसांत पूर आणि भूस्खलनामुळे आसाममध्ये 26 आणि मेघालयात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्रिपुरामध्येही 12 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आसाममधील 28 जिह्यांमध्ये 19 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत, तर सुमारे 1 लाख लोक मदत शिबिरांमध्ये आहेत. राज्यातील होजई जिह्यात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट बुडाली. अपघातानंतर तीन मुले बेपत्ता आहेत. 21 जणांची सुटका करण्यात आली आहे.
मेघालयमध्ये पावसामुळे 1700 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. मेघालयातील मौसिनराम आणि चेरापुंजी येथे 1940 नंतर सर्वाधिक पाऊस झाला आहे. मौसिनराम येथे गेल्या 24 तासात 1003.6 मिमी पाऊस झाला आहे. यापूर्वी 16 जून 1995 रोजी 1563.3 मिमी, 5 जून 1956 रोजी 973.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे शुक्रवारी सकाळी 8ः30 वाजेपर्यंत 24 तासांत 972 मिमी पावसाची नोंद झाली.
आसाममध्ये 11 लाख लोकांना फटका
आसाममध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यातील सुमारे 25 जिल्हे पुराच्या विळख्यात असून 11 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. ब्रह्मपुत्रा, गौरांग, कोपिली, मानस आणि पगलाडिया नद्यांच्या पाण्याची पातळी राज्यातील अनेक भागांमध्ये धोक्मयाच्या चिन्हाच्या वर आहे. आसाममध्ये 21 जूनपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे सुमारे 19,782.80 हेक्टर पीकजमीन पाण्याखाली गेली आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, 72 महसूल मंडळांतर्गत 1,510 गावे पाण्याखाली आहेत. परिस्थिती पाहता प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थिती नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
त्रिपुरामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग वाहून गेला आहे. यानंतर सरकारने महामार्ग बंद केला आहे. हा महामार्ग त्रिपुरा, दक्षिण आसाम, मिझोराम आणि मेघालय या भागांना जोडतो. पूर आणि भूस्खलनासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी विशेष एनडीआरएफ पथके रवाना केली आहेत. तसेच विशेष प्रशासकीय अधिकाऱयांची नेमणूकही केली आहे.