मणिपूरमधील घटना : पोलिसांनी निदर्शकांना रोखले : दोन विद्यार्थ्यांच्या हत्येमुळे तणाव
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या हत्येवरून चार दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. संतप्त जमावाने इंफाळमध्ये मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांच्या वैयक्तिक मालकीच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी जमावाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून सुमारे 500 मीटरपूर्वीच रोखले आहे. अश्रूधूराचा वापर करत जमावाला पांगविण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
यापूर्वी निदर्शकांनी बुधवारी थोबुल जिल्ह्यातील भाजप कार्यालय पेटवून दिले होते. तर इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष शारदा देवी यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला आहे. याचबरोबर इंफाळ पश्चिम येथील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानात जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या भागांमध्ये हिंसा भडकली आहे, त्या भागांना राज्य सरकारने शांततापूर्ण घोषित केले आहे.
मृत विद्यार्थ्यांच्या घरानजीक निदर्शने
इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील टेरा येथे हजारो लोकांनी मृत विद्यार्थ्यांच्या घरानजीक निदर्शने केली आहेत. विद्यार्थ्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी निदर्शकांनी केली आहे. तर आम्हाला केवळ या विद्यार्थ्यांचे मृतदेह हवे आहेत, जेणेकरून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता येतील. मृतदेह मिळत नाहीत तोवर आम्ही कुठल्याही गोष्टीवर तडजोड करणार नाही. तसेच आर्थिक भरपाईही स्वीकारणार नसल्याचे पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
श्रीनगरच्या एसएसएपीची बदली
केंद्र सरकारने श्रीनगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राकेश बलवाल यांची जम्मू-काश्मीरमधून मणिपूरमध्ये बदली केली आहे. राकेश बलवाल हे 2012 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असून 2021 च्या अखेरीस त्यांची श्रीनगरचे एससएपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर हिंसेदरम्यान त्यांना मूळ कॅडर मणिपूर येथे पाठविण्यात आले आहे. बलवाल हे यापूर्वी एनआयएमध्ये देखील कार्यरत राहिले आहेत. 2019 मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणाऱ्या पथकाचे ते सदस्य राहिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आयपीएस राकेश बलवाल यांना एजीएमयुटी कॅडरमधून मणिपूर कॅडरमध्ये पाठविण्याच्या गृह मंत्रालयाला प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
शांततापूर्ण भागातच हिंसा
27 सप्टेंबर रोजी जारी अधिसूचनेनुसार मैतेईबहुल 19 पोलीस स्थानकांच्या क्षेत्राला अफ्स्पापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. तर 1 ऑक्टोबरपासून कुकी-नागाबहुल भागांमध्ये अफ्स्पा लागू होणार आहे. चकित करणारी बाब म्हणजे मैतेईबहुल भागांना अफ्स्पाच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. तर उर्वरित हिस्स्याला अशांत घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांच्यावर मैतेई समर्थक असल्याचा आरोप होत आहे. शांततापूर्ण घोषित करण्यात आलेल्या इंफाळ, थोबुलमध्येही मैतेई जमावाने जाळपोळ करत भाजप कार्यालय पेटवून दिले आहे.