कर्नाटक, महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे विनंती करण्याची मागणी
निपाणी – कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यापासून अगदी ऐंशीच्या दशकापर्यत मराठी ,हिंदी ,गुजराथी इ.भाषेतील चित्रपट सृष्टीत अधिराज्य गाजविणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री पद्मश्री सुलोचना लाटकर यांची जन्मभूमी कर्नाटक तर कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांनी भारत सरकारकडे सुलोचना लाटकर यांना मरणोत्तर फाळके पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी करावी, असे निवेदन निपाणी नगरपालिकेचे माजी सभापती प्रा.राजन चिकाेडे यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.
केवळ मराठी चित्रपटातच नव्हे तर कर्नाटक राज्यांतील सामाजिक ,सांस्कृतिक जीवनात सुलोचना या नावाबद्दल अथांग आपुलकी व आदर आहे.निपाणी पंचक्रोशीची ही सुकन्या खडकलाट सारख्या ग्रामीण भागातून करवीरनगरीत जावून चित्रतपस्वी गुरूवर्य भालजी पेंढारकर यांच्याकडे अभिनयाचे धडे घेवून जवळ जवळ चारशे चित्रपटातून मराठी मातीतील शालीनता. घरदांज अभिनय व सोज्वळतेचा चेहरा चित्रजगताला दिला. चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत वावरताना ही 1961साली चिनी आक्रमणा वेळी भारत सरकारच्या आवाहाना नुसार सरंक्षण कार्यासाठी स्वतःचे दागदागीने व निधी उपलब्ध करुन देऊन आपल्या देशभक्तीचे ,सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. भारतीय सिनेसृष्टीच्या शंभर वर्षी सुलोचना लाटकर तब्बल ७०ते ८० वर्षांच्या साक्षीदार आहेत.
दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांचे गुरूवर्य भालजी पेंढारकर यांना मिळाला आहे.तेव्हा त्यांच्या शिष्येलाही हा सन्मान मिळावा अशी अनेक रसिकाची अनेक वर्षापासून मागणी आहे . यासाठी भारत सरकारकडे वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न हाेत आहेत. पण दिल्ली दरबारी आज पावतो दखल का घेतली नाही यांचे आश्चर्य वाटते .तेव्हा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या मुख्यामंत्र्यांनी सर्व रसिकांच्या वतीने केंद्र सरकारकडे त्यांना मरणोत्तर चित्रपटसृष्टीतील मानाचा हा पुरस्कार देवून गौरव करण्याची मागणी केली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.