मुंबई: राज्यसभा निवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच बच्चू कडू (bachchu kadu) यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. बच्चू कडू हे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरु करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख आहे आणि धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी हात वर करत आहे. केंद्र सरकारने खरेदी नाही केली तर एका हेक्टरला जार हजार रूपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात. आमचं मतदान भाजपला जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करु, असे बच्चू कडू यांनी म्हटले. राजकीय वर्तुळात बच्चू कडू यांच्या या विधानची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांचा एकंदरित सूर पाहता राज्यसभा निवडणुकीत ऐनवेळी बच्चू कडू काही वेगळी भूमिका घेतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.