जांबोटी ग्राम पंचायत – सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : जबाबदारी कुणाची?
वार्ताहर /कणकुंबी
बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील जांबोटी बसस्टँडजवळील गटारातून रस्त्यावर वाहणारे सांडपाणी गेल्या दोन-तीन वर्षापासून प्रवासीवर्गाला व नागरिकांना त्रासदायक बनलेले आहे. जांबोटी ग्राम पंचायत व सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत असल्याने या सांडपाण्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
जांबोटी बसस्टँडवरील हणमंत पेट्रोलपंपाजवळ गटातून वाहणारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे याचा त्रास नागरिकांबरोबरच प्रवासीवर्गाला होत आहे. जांबोटी बसस्टँडवरील काही हॉटेलमधील तसेच चिकन आणि मटन दुकानातील पाणी बाथरूम, शौचालय व इतर सर्वप्रकारच्या मिश्रित दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे काही नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने येथील नागरिकांना पायी चालत जाणे कठीण बनले आहे. तसेच येथील स्थानिक नागरिकांना त्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागत आहे.
दुकानदारांना केवळ सूचना, ठोस कारवाई नाही
यापूर्वी बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे होती. परंतु सध्या हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला आहे. सदर सांडपाणी काढण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हेच कळेनासे झाले आहे. गटार साफ करून नाल्याद्वारे पाणी सोडल्यास रस्त्यावरील दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्र्रश्न निकालात निघू शकतो. यासंबंधी ग्राम पंचायतीला विचारले असता आम्ही संबंधित दुकानदारांना सूचना केलेली आहे, एवढेच सांगितले जाते. परंतु ठोस कारवाई करण्यास ग्रामपंचायत धजावत नाही. त्यामुळे याचा फटका स्थानिक नागरिकांबरोबरच प्रवासी, दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांना बसत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सांडपाण्याचा बंदोबस्त करणे नितांत गरजेचे असून जर याकडे दुर्लक्ष केले गेले तर काही स्थानिक नागरिकांकडून ग्रा.पं.वर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
ग्रा. पं.ची उदासीनता
या बाबतीत जांबोटी ग्राम पंचायतीनेसुद्धा उदासीनता बाळगलेली दिसत असून केवळ दुकानदारांना सूचना करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. या सांडपाण्याच्या बाबतीत दुकानदारांवर कठोर कारवाई करून, सांडपाण्याचा बंदोबस्त करणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा जांबोटी ग्राम पंचायतीच्या बेजबाबदारपणाचा बोजवारा उडेल.