भंडारी समाजातील नेत्यांचे आवाहन : मोदींकडून आतापर्यंत बहुजन समाजाला मदत
मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुजन समाजातील आहेत. बहुजन समाजासाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या आहेत. हल्लीच गोवा भेटीच्या दरम्यान, ज्या गोरगरीबांना घरे नाहीत किंवा घरे मोडकळीस आली आहेत अशा लोकांना घरे बांधून देण्याचे वचन त्यांनी दिले आहे. त्यामुळे गोव्यातील तमाम बहुजन समाजाने भाजपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन भंडारी समाजातील नेत्यांनी काल सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. गोमंतक भंडारी समाजाचे उपखजिनदार तथा मडगाव भाजप मंडळाचे सरचिटणीस सुनील कृष्णनाथ नाईक, सासष्टी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष धनंजय मयेकर, सासष्टी तालुका भंडारी समाज महिला अध्यक्ष नर्मदा कुंडईकर तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे दक्षिण अध्यक्ष पराग रायकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे आवाहन केले.
मोदींकडून बहुजन समाजाला मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुजन समाजाचे हित जपले आहे. त्यांनी चांगल्या योजना राबविल्या आहेत. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब कारागीर, लघु उद्योजक तसेच भाजीपाला विक्री करणाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे.
मोदींमुळे राज्याचा विकास झपाट्याने
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने राज्याच्या विकासाला चालना मिळालेली आहे. गोव्यातील रस्त्याच्या दर्जात सुधारणा झालेली आहे. त्याचा लाभ उद्योग व्यवसायाला होत आहे आणि त्यामुळे गोव्याच्या आर्थिक व्यवस्थेला बळकटी मिळते आणि रोजगार निर्मिती होत असल्याचा दावा सुनील नाईक यांनी केला.
भाजपने आरक्षणात केली वाढ
काँग्रेस सरकारची राजवट असताना केवळ 19 टक्के आरक्षण होते. आरक्षणात वाढ करावी यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु, त्याला दाद दिली नाही. जेव्हा स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्याकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा नेण्यात आला, त्यांनी 19 टक्क्यांवरून 27 टक्के आरक्षणात वाढ करून दिल्याचा दावा ही करण्यात आला. आरक्षणात वाढ करण्यात आल्याने ओबीसी समाजातील मुले उच्च शिक्षण घेऊ शकली. त्यामुळे त्यांना चांगल्या नोकरीची संधी प्राप्त झाली व त्यांच्या राहणीमानात बदल झाला. भाजपने बहुजन समाजाला विविध योजनांतून मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे सर्वांनी भाजपला पाठिंबा द्यावा असे सुनील नाईक म्हणाले.