आज वाहतूक सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार- पालकमंत्र्यांचे आश्वासन
वाकरे। प्रतिनिधी
प्रशासनाने बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुंबईत मंत्रालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक सुरू करावी अशी मागणी केली.याबाबत पालकमंत्र्यांनी आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.
गेले तीन दिवस कोल्हापूर -गगनबावडा मार्गावरील वाहतूक बालिंगे पूल कमकुवत असल्याच्या कारणावरून प्रशासनाने आणि राष्ट्रीय रस्ते विकास मंडळाने बंद केली आहे. त्यामुळे जनतेमध्ये उद्रेक असून पर्यायी मार्गाने प्रवास करणे जीकेरीचे झाले आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रशासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान जनतेची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुंबईत मंत्रालयात जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची बुधवारी रात्री उशिरा भेट घेतली आणि पाच तालुक्यातील जनतेची गैरसोय होत असल्याने किमान रुग्णवाहिका, लहान कार, दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी ही वाहतूक चालू करावी आणि जनतेची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली. सध्या शेतकरी, नोकरदार, एमआयडीसी मध्ये काम करणारे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची पर्यायी मार्गाने प्रवास करत असताना होणारी गैरसोय नरके यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.पालकमंत्री आज कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोल्हापूर- गगनबावडा मार्ग सुरू करण्यासाठी पाण्याची पातळी किती आहे आणि बालिंगे पूलाची परिस्थिती पाहून जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी वाहतूक सुरक्षा करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन माजी आमदार नरके यांना दिले आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.