वार्ताहर /धामणे
गेल्या चार-पाच दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धामणे, नंदिहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा (ये.) या भागातील बळीराजा धास्तावून गेला आहे.
यंदा सुरुवातीला पावसाने बऱयापैकी साथ दिली होती. आतापर्यंत साडेतीन महिन्यांच्या कालावधीत मुसळधार पावसाने दोन वेळा नाल्यांना पूर आला. त्यामुळे भात पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. आता शेतकऱयांची पिके थोडी सुधारली असून भात पीक पोसवत आहे. त्यातच पुन्हा जोरदार पाऊस पडत आसल्याने भात खराब होऊन शेतकऱयांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. यातच पूर आला तर बळीराजा यंदा भात पिकाला मुकणार आहे. आता पावसामुळे हातातोंडाला आलेले सोयाबीन पीक खराब होत आहे.
धामणे, मासगौंडहट्टी, अवचारहट्टी, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड, सुळगा (ये.) या भागात भात पिकाबरोबर सोयाबीन पिकाची पेरणी मोठय़ा प्रमाणात केली जाते. त्याचप्रमाणे भुईमुग, बटाटा ही पिकेही येथील शेतकरी घेतात. सोयाबीन पिकाला कष्ट आणि खर्चही कमी लागत असल्याने या पिकाकडे येथील शेतकरी वळला आहे. यंदा सोयाबीन पीक चांगले होते. या पिकाला फुले येत असताना पाऊस नको आहे. मात्र, या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून रोप खराब होत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. एकंदरीत हा पाऊस या भागातील शेतकऱयांना मारक ठरत आहे.