वृत्तसंस्था/ मुंबई
सध्या सुरू असलेल्या 2022 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या समारोप समारंभसाठी बीसीसीआयकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेच्या समारोप समारंभाकरिता इच्छुकांकडून टेंडर प्रक्रियेद्वारे निविदांची मागणी करण्यात आली आहे.
टेंडरद्वारे निविदा सादर करणाऱया इच्छुकांसाठी नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. इच्छुकांना निविदा सादर करताना एक लाख रूपयांची रक्कम (परत न मिळण्याच्या अटीवर) द्यावी लागणार आहे. 25 एप्रिलपर्यंत इच्छुकांकडून निविदा स्वीकारल्या जातील, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. 2019 पासून या स्पर्धेचा उद्घाटन आणि समारोप समारंभ करण्यात आला नव्हता. 2020 आणि 2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामने प्रेक्षकविना बंदीस्त स्टेडियममध्ये कोरोना समस्येमुळे खेळविले गेले होते. 2022 च्या आयपीएल स्पर्धेतील लीग सामने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या दोन शहरामध्ये खेळविले जात आहेत. कोरोनाच्या नियमामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान या स्पर्धेतील प्ले ऑफ गटातील सामन्यांच्या तारखा अद्याप ठरविण्यात आलेल्या नाहीत.