अभिनेत्री व हरियाणातील भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या कथित खून प्रकरणानंतर गोव्यातील ड्रग्ज व्यवहाराचे कारनामे देशभरातील माध्यमांतून पुन्हा चर्चेत आले. हणजूण किनाऱयावरील ज्या कार्लिस पब व रेस्टॉरंटमध्ये हे हत्याकांड घडले, त्यावर बुलडोझर फिरविण्यात आला. अशा घटना अधूनमधून घडतात व गोव्यातील गुन्हेगारी जगतातील काळे कारनामे काही काळापुरते चर्चेचा विषय बनून राहतात. गोव्याची ओळख आता ‘नार्को टुरिझम हॉटस्पॉट’ अशीच झाली आहे, हे खेदाने म्हणावे लागेल. या गैरव्यवहारात नायजेरियन व रशियन टोळय़ा सक्रिय असून या विदेशी लोकांनी गोव्यात आपले बस्तान मांडले आहे. त्यात आता बांगलादेशी घुसखोरांचा गोव्यातील वावर उघड झाल्याने सुरक्षायंत्रणेपुढे एक नवे आव्हान उभे ठाकले आहे.
किनारी भागातील अमलीपदार्थांच्या गुन्हेगारी जगतात गोवा पोलीस व नायजेरियनांचे साटेलोटे यापूर्वीच उघड झाले आहेत. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात हे प्रकरण भयंकर गाजले. त्याची परिणती म्हणून काही पोलीस कॉन्स्टेबलांसह अधिकाऱयांवरही कारवाईचे खटले गुदरले. साधारण दहा वर्षांपूर्वी दिवाळीच्या पूर्वसंध्येला पर्वरी येथे महामार्ग अडवून भररस्त्यात नायजेरियनांनी घातलेला धिंगाणा गोमंतकीय अजूनही विसरलेले नाहीत. विदेशी नागरिकांचा भररस्त्यात चाललेला हा नंगानाच पोलीस यंत्रणेचे धिंडवडे काढून गेला. नायजेरियन व रशियनानंतर आता बांगलादेशी नागरिकांनीही गोव्यात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. डिचोली तालुक्यात भंगार गोळा करण्याच्या नावाखाली गेल्या काही वर्षांपासून बस्तान मांडून असलेल्या या घुसखोरांवर दोन दिवसांपूर्वी एटीएस पथकाने धडक कारवाई केली. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. गेल्या पाच वर्षांपासून हे घुसखोर ओळख बदलून या भागात राहत असून त्यांच्याकडे आधारकार्डही आढळून आले आहे. एवढी वर्षे भंगारवाले म्हणून वावरणारे व स्थानिकांच्या खोल्यांमध्ये भाडेकरू म्हणून राहणारे हे लोक स्थानिक पोलिसांच्या नजरेतून कसे सुटतात? हाच मुळात तपासाचा विषय आहे. अंतर्गत सुरक्षायंत्रणेचे हे मोठे अपयश म्हणावे लागेल. महिन्याभरापूर्वी फोंडा तालुक्यातील तिस्क-उसगांव भागात दोन बँकांच्या एटीएम दरोडाप्रकरणी आंध्रप्रदेश पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये बांगलादेशींचा सहभाग आढळून आला. या प्रकरणातून बांगलादेशी टोळय़ाही आता गोव्यातील गुन्हेगारी जगतात सक्रिय झाल्याचे लपून राहिलेले नाही.
किनारी भागातील अमलीपदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेले नायजेरियन विद्यार्थी व्हिसा घेऊन भारतात प्रवेश करतात व त्याचा फायदा उठवित बराच काळ गोव्यात आपले गैरव्यवहार चालवतात. मात्र बांगलादेशी नेमक्या कुठल्या मार्गातून गोव्यात येतात व त्यांना कुणाकडून भारतीय नागरिक असल्याचे ओळखपत्र मिळते? याचा सखोल तपास होणे आजघडीला गरजेचे आहे. पश्चिम बंगाल व नैर्त्रुत्य भारतात बांगलादेशींनी मोठय़ा प्रमाणात घुसखोरी केलेली आहे. येथील मूळ भारतीय व या घुसखोरांमध्ये संघर्षही सुरू आहे. मात्र, गोव्यापासून ते तसे बरेच लांब होते. विधानसभा निवडणुकीच्यावेळी गोव्यात नव्याने प्रवेश केलेल्या काही राजकीय पक्षांच्या सभांमध्ये गर्दी जमविण्यासाठी परप्रांतीय लोकांना आणणारे कंत्राटदार सक्रिय झाल्याची चर्चा त्यावेळी सुरू होती. पण निवडणुकीच्या धामधुमीत त्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. राज्यातील बांधकाम क्षेत्रात परप्रांतीय मजुरांबरोबरच आता बांगलादेशी कामगारही येऊ लागल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते. फोंडा तालुक्यातील तिवरे-माशेल भागात वर्षभरापूर्वी भाडेकरू म्हणून राहणाऱया अशा काही कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
डिचोलीत ज्या बांगलादेशी घुसखोरांना एटीएसने ताब्यात घेतले, त्यांच्याकडून बरीच धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून डिचोली, सांखळी व वाळपई भागात या लोकांचे वास्तव्य असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. प्लास्टिक भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने वावरणारे हे लोक डिचोली भागात भाडेकरू म्हणून राहायचे. हे सर्वजण मूळ उत्तर राजापूर पोस्ट, राजापूर बाजार, बांगलादेश येथील आहेत. बंगळुरुमार्गे त्यांनी गोव्यात प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे आधारकार्डही आढळून आले आहे.
मडगाव किंवा वास्को रेल्वेस्थानकावर दरदिवशी बगलबच्चांसह मजुरांचे अनेक तांडे गोव्यात उतरतात व बेमालूमपणे येथील विविध भागामध्ये मिसळून जातात. रेल्वेस्थानके व परराज्यातून येणाऱया बसेसमधील संशयास्पद प्रवाशांची तपासणी करणारी कुठलीच ठोस यंत्रणा राज्याच्या सीमांवर सक्रिय दिसत नाही. गोव्यातील सुरक्षायंत्रणांचे सुशेगादपण त्यांच्या पथ्यावर पडते. शहरालगत वाढणाऱया झोपडपट्टय़ा व मजूर वस्त्या पोलीस यंत्रणेच्या स्कॅनरखाली आल्याशिवाय या विदेशी घुसखोरीला आळा घालता येणार नाही. कारण या झोपडपट्टीतील गरीबीच्या आड हे गुन्हेगार आश्रय घेतात व तेथूनच आपल्या गुन्हेगारीस्वरुप कारवाया आखतात. भाडेकरू ठेवणाऱया घरमालकांनाही आता जबाबदारीचे भान ठेवून अधिक सजगपणे व्यवहार करावा लागेल. पैशांसाठी कुणालाही खोल्या देताना भाडेकरुंची संपूर्ण पडताळणी करूनच त्यांना आश्रय द्यावा लागेल. त्यांच्याकडे येणारे नातेवाईक व मित्रांचीही चौकशी करण्याची तसदी घ्यावी लागेल. अन्यथा भाडेकरू बनून आलेले हे लोक आश्रयदात्याचे घर कधी साफ करून जातील, हे कळणारही नाही!
शेजारील राष्ट्रातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी नागरिकत्व कायदा आता एका अर्थाने अनिवार्य वाटू लागला आहे. त्याची प्रचिती गोव्यातील बांगलादेशी घुसखोरांच्या उघड वावरामुळे येते. भंगारवाले, बांधकाम मजूर म्हणून जोपर्यंत ते वावरत होते, तोपर्यंत त्यांचे बेकायदेशीर वास्तव्य नजरेत आले नव्हते. बँकेच्या एटीएम दरोडय़ामध्ये या टोळक्यांचा सहभाग उघड झाल्याने आता सुशेगाद राहता येणार नाही. गोव्यातील गुन्हेगारी जगतात नायजेरियननंतर बांगलादेशींनीही हातपाय पसरविल्याने त्याचा बीमोड करावाच लागेल!
सदानंद सतरकर