विवाहपूर्व आरोग्य चाचणीचा अभाव : अनारोग्याच्या घटना उघडकीस
बेळगाव : लग्न ठरताना व लग्न झाल्यानंतर पती-पत्नीपैकी कोणा एकाला एचआयव्ही असल्याचे सत्य दडवून ठेवल्याने संसार उद्ध्वस्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. विवाहानंतर आपला पती एचआयव्ही बाधित आहे, हे पत्नीला समजल्याने त्या धक्क्यातून त्यांना सावरणे कठीण होत असून कुटुंबही उद्ध्वस्त होत आहे. हे सत्य उघडकीस आल्यानंतर मुलीचे कुटुंबीय न्यायालयात धाव घेतात. परंतु तोपर्यंत सदर मुलीलासुद्धा एचआयव्ही संसर्ग झाल्याचे वास्तव पुढे येते. बेळगाव परिसरात गेल्या काही महिन्यांत अशा घटना सातत्याने घडत आहेत. एचआयव्ही हा संसर्गजन्य रोग आहे. त्यावर अनेक औषधे येत आहेत. एचआयव्हीचे अलीकडे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही रुग्ण आढळतात. उत्तम दर्जाच्या औषधांमुळे हा आजार बऱ्यापैकी नियंत्रणात आला असला तरी अजूनही तो पूर्णपणे संपलेला नाही. तथापि, आपला मुलगा एचआयव्ही बाधित आहे, हे माहिती असूनही ते सत्य लपवून पालक त्याचा विवाह करण्याची घाई करतात आणि त्याचा विवाह होतोसुद्धा. परंतु नंतर मुलीला आपला पती एचआयव्ही बाधित आहे हे कळते तेव्हा तिचे जीवनच उद्ध्वस्त होते आणि दोन कुटुंबांमध्ये ताणतणावाबरोबरच अनेक प्रश्न निर्माण होतात. यासाठीच विवाहापूर्वी कुंडलीपेक्षा वैद्यकीय चाचणी महत्त्वाची ठरत आहे. बेळगाव परिसरात अशा घटना घडल्यानंतर पालक घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतात. पण तोपर्यंत ‘त्या नववधू’लासुद्धा एचआयव्हीची बाधा झाल्याचे वास्तव समोर येते. मुलाच्या कुटुंबीयांनी ही माहिती आधीच स्पष्ट केली असती तर त्या मुलीचे आयुष्य पणाला लागले नसते. परंतु हे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे पालकांनी आणि विशेष करून मुलींच्या पालकांनी योग्य ती सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एचआयव्ही हा शारीरिक संबंधातून, रक्तातून किंवा एचआयव्ही बाधित व्यक्तीला दिलेल्या इंजेक्शनच्या माध्यमातूनही एचआयव्हीची बाधा होऊ शकते. एचआयव्ही म्हटल्यानंतर मरण हे निश्चितच असे यापूर्वी मानले जात होते. मात्र अलीकडे एचआयव्हीवर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. यामुळे एचआयव्ही झाला तरी किमान 20 ते 25 वर्षे, काही जण तर वृद्धापकाळही व्यतित करत आहेत. औषधांच्या आधारे माणूस जगू शकतो, हे जरी खरे असले तरी एकापासून दुसऱ्याला हा भयानक आजार होतो. त्यामुळे लग्न ठरविताना जन्मपत्रिका पाहण्यापेक्षा रक्त तपासणीच महत्त्वाची आहे, असे जाणकारांतून बोलले जात आहे. याबाबत अनेक वकिलांनी आई-वडिलांना वैद्यकीय तपासणीचा आग्रह धरा, असे सांगितले आहे.
‘आरोग्यम् धनसंपदा’कडे दुर्लक्ष
आज-काल उपवर मुलींच्या अपेक्षाही भलत्याच वाढल्या आहेत. मुलगा चांगला कमावता हवा, त्याची भरपूर शेती असावी, घरात चार चाकी असावी, घरात जास्त माणसे नसावीत, हेच पाहिले जाते. या वाढत्या अपेक्षांमुळे बऱ्याच मुलींचे वय वाढते आणि लग्न जुळणे कठीण होऊन बसते. कर्म धर्म संयोगाने एखादा मुलगा मिळालाच तर त्याचे आरोग्य, त्याची व्यसने किंवा त्याच्या इतर वाईट सवयींची कसलीच चौकशी न करता गळ्यात माळ घातली जाते. काही दिवसांनंतर स्वत:च्या लग्नात ‘झिंगाट’ गाण्यावर नृत्य करणारा तो जेव्हा स्वत:च झिंगून येऊ लागतो किंवा त्याच्या आजाराचे बिंग फुटते तेव्हा पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही.
लग्नापूर्वी वैद्यकीय चाचणी आवश्यक
एचआयव्ही बाधित असूनही विवाह झाल्याच्या तीन घटना एका महिन्यातच उघडकीस आल्या आहेत. न्यायालयात त्या उघड होतातच. परंतु अनेक जण समाजामध्ये बेअब्रू होऊ नये यासाठी मन मारून आपला संसार पुढे रेटत आहेत. विवाहापूर्वीच वैद्यकीय चाचणी झाली असती तर निष्कारण कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते. त्यामुळे सरकारनेच लग्नापूर्वी वैद्यकीय चाचणी बंधनकारक करणे गरजेचे आहे. आपण याबाबत याचिका दाखल करणार आहे.
कुंडलीपेक्षा आरोग्य महत्त्वाचे
लग्न ठरविताना कुंडली पाहिली जाते. मुलाचे आणि मुलीचे त्या कुंडलीच्या माध्यमातून गुण पाहिले जातात. पण खरोखर यावरून संसार यशस्वी होतो का? हे पाहणे साऱ्यांचेच कर्तव्य आहे. कारण कुंडलीपेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे. समाजात अनेकांनी कुंडली न पाहता विवाह करूनही यशाचे शिखर गाठले आहे. असे असताना केवळ कुंडलीवर विश्वास ठेवून विवाह करणे किती धोक्मयाचे आहे हे आता न्यायालयात उघड झालेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. म्हणूनच तरुण-तरुणींनी विवाह बंधनात अडकण्यापूर्वी पालकांच्या मर्जीने आणि त्यांनी परवानगी दिली नाही तरी आपली जबाबदारी समजून वैद्यकीय चाचणी करणे हे सर्वांच्याच सोयीचे ठरणार आहे.
भविष्यात धोका टाळण्यासाठी सजग व्हा
विवाह ठरण्यापूर्वी किमान सहा महिने आधी रक्त तपासणी करणे आवश्यक आहे. कारण पहिल्या टप्प्यामध्ये एचआयव्ही आहे हे सहजगत्या समजत नाही. अलीकडे विवाह करताना बऱ्याचशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात. पण हे भविष्याच्यादृष्टीने धोक्मयाचे आहे. तेव्हा तऊण-तऊणीच्या कुटुंबीयांनी विनासंकोच वैद्यकीय चाचणीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. केवळ एचआयव्हीच नाही तर बऱ्याच वेळा इतर आजारांमुळे संसार अयशस्वी ठरतो.