लालकृष्ण किशनचंद अडवाणी यांचे गोव्याशी खूप चांगले संबंध पूर्वीपासून आहेत. अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी या जोडीचे गोव्याला खूप प्रेम मिळाले. वाजपेयींना मृत्यूपूर्वीच ‘भारतरत्न’ मिळाले. ‘यात्राकार अडवाणी’ म्हणून देशातच नव्हे, तर जगात सुविख्यात असलेल्या अडवाणींनी आपल्या जीवनात राष्ट्रहित हे केंद्रबिंदू मानून संघर्षमय जीवनाची वाटचाल करताना लहानमोठ्या शंभराहून अधिक यात्रा यशस्वी केल्या.
वर्ष 2024 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी उप पंतप्रधान लालकृष्ण किशनचंद अडवाणी, बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पूरी ठाकुर, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, जगविख्यात कृषी संशोधक एम. एस. स्वामीनाथन या पाच महानुभवांना भारतीय सर्वश्रेष्ठ सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची शिफारस केल्यानंतर तशी जाहीर घोषणाही करण्यात आली आहे. ही पाच धरुन आतापर्यंत 53 व्यक्तींना भारतरत्नने सन्मानीत केले आहे. 1954 सालापासून हा सन्मान बहाल करण्यात येतो.
या सन्मानात कोणत्याही धनराशीचा समावेश नसतो. भारतरत्न पदक व राष्ट्रपतींच्या सहीसह प्रशस्तीपत्राचा समावेश असतो. भारतरत्न प्राप्त झालेल्या व्यक्तीस भारतीय रेल्वेत व एअर इंडियामध्ये आजीवन मोफत प्रवासाची सुविधा मिळते. त्या व्यक्ती देशातील सर्व राज्यांच्या अतिथी ठरतात आणि सर्व राज्यांमध्ये त्यांना ‘राज्य अतिथी’ दर्जा प्राप्त होतो. याशिवाय राजकीय पासपोर्ट मिळतो, ज्यामुळे त्या व्यक्तीस कोणत्याही विमानतळाच्या व्हीआयपी विभागापर्यंतची सेवा मिळते. राज्य किंवा केंद्र सरकारच्या कार्यक्रमांचे निमंत्रणही मिळते. त्यांना ‘वॉरंट ऑफ प्रेसिडेंट’मध्ये स्थान प्राप्त होते. शिष्टाचारमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, उप पंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभा सभापती, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, संसदेच्या दोन्ही सभेतील विरोधी पक्षनेते, यानंतरच्या क्रमवारीत भारतरत्न प्राप्त व्यक्तीला स्थान प्राप्त होते.
लालकृष्ण किशनचंद अडवाणी यांचे गोव्याशी खूप चांगले संबंध पूर्वीपासून आहेत. अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी या जोडीचे गोव्याला खूप प्रेम मिळाले. वाजपेयींना मृत्यूपूर्वीच ‘भारतरत्न’ मिळाले. ‘यात्राकार अडवाणी’ म्हणून देशातच नव्हे, तर जगात सुविख्यात असलेल्या अडवाणींनी आपल्या जीवनात राष्ट्रहित हे केंद्रबिंदू मानून संघर्षमय जीवनाची वाटचाल करताना लहानमोठ्या शंभराहून अधिक यात्रा यशस्वी केल्या. वेगवेगळ्या स्वरुपातील या यात्रा शेवटी राष्ट्रहिताकडेच पोहोचणाऱ्या होत्या. कडक शिस्तीचे, सुस्पष्ट वक्ते, संपूर्ण जीवन राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी अर्पण केलेले अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले एक जगविख्यात ‘बोल्ड लीडरशिप’ आक्रमक नेतृत्व! रामरथ यात्रा, जनादेश यात्रा, भारत सुरक्षा यात्रा, स्वर्ण जयंतीरथ यात्रा, भारत उदय यात्रा या अडवाणींच्या पाच यात्रा लक्षवेधी तसेच बहुचर्चित ठरल्या. रामरथ यात्रेद्वारे अडवाणीनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या यात्रेत सहभागी होण्यासाठी गोव्याहूनही स्वयंसेवक गेले होते. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिर व्हावे, यासाठी काढलेल्या रामरथ यात्रेने देशातील राजकारण, समाजकारण ढवळून निघाले. मोठ्या प्रमाणात राजकीय ध्रुवीकरण घडवून आणले. त्यानंतर आता अयोध्येत भव्यदिव्य मंदिर उभे राहिल्याचे त्यांना याची देही, याची डोळा पाहण्याचे भाग्य लाभले आणि जीवंतपणी भारतरत्नने सन्मान झाला, हा त्यांच्या जीवनातील आणखी दुर्ग्धशर्करा योग! युवकांना 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा हक्क मिळावा, अशी महत्त्वपूर्ण पुरोगामी मागणी सर्वांत प्रथम अडवाणींनी केली होती. बालकांपासून युवकांपर्यंतच्या शिक्षणात राष्ट्रप्रेम निर्माण करणारा अभ्यासक्रम असायलाच हवा, असा आग्रह त्यांनी योग्य त्या व्यासपीठावरुन सातत्याने धरला. ब्रिटिशांच्या राजवटीमुळे जे काही भारतीय इंग्रजाळलेले आहेत, त्यांच्यावर भारतीय संस्कार व्हायला हवेत आणि ते राष्ट्रकार्य राष्ट्रीय स्वयंसेवक करीत आहे, असे सुस्पष्टपणे सांगणारे अडवाणी गोव्याला पूर्वकडचे रोम करणाऱ्यांवरही कडक शब्दांत बरसले. गोव्यात आणि गोव्याबाहेर कुठेही असताना अडवाणी ‘गोवा भारताची दक्षिण काशी’ असाच उल्लेख करत आले आहेत. गोव्याच्या साक्षरतेचे त्यांनी अनेकवेळा प्रशंसा केली. गोव्यात त्यांच्या अनेक सभा ऐतिहासिक ठरल्या. म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिरासमोर झालेली त्यांची जाहीरसभा ही गोवा भाजपसाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरली होती. पाटो-पणजी येथील ईडीसी मैदानावरील (आज मैदान राहिलेले नाही) अडवाणी व उमा भारती यांची जाहीरसभाही पुन्हा टर्निंग पॉइंट ठरली होती. भरपावसात उघड्या मैदानावरील या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेला भाजपप्रेमी जनसमूदाय तसेच पत्रकारही सभेपासून हटले नाहीत. वाजपेयींच्या कांपाल मैदानावरील सभाही अशाच ऐतिहासिक ठरल्या होत्या. गोवा हे भौगोलिकदृष्ट्या छोटे राज्य असले तरी ते निसर्गसंपदेने परिपूर्ण आहे, त्याचे जतन व्हायला हवे, असा आग्रह अडवाणींचा होता. काश्मिरकडे भारताचे नंदनवन म्हणून पाहतो, तसेच गोव्याकडेही हे दक्षिणेतले नंदनवन म्हणून पाहावे. सरकारे या पक्षाची त्या पक्षाची येतील आणि जातील, कायम रहायला हवा तो नंदनवन गोवा! असे त्यांनी अनेकवेळा सांगितले. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्याचा अडवाणीनी विशेष गौरव केला. गोव्यातील मंदिरांचे अडवाणींना खूप आकर्षण आहे. पोर्तुगीजांनी पाडलेल्या मंदिरांचे भग्न अवशेष पाहून त्यांना फार यातनाही झाल्या. त्याबाबतही त्यांनी वेळोवेळी शक्य त्या व्यासपीठावरुन आणि लोकसभेतूनही मते मांडली. तीन दशकांच्या म्हणजे तीस वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी लोकसभेत व राज्यसभेत गोव्याच्या हिताचे विषय मांडले आहेत. गोव्यात ज्यावेळी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचे नाव पुढे करण्यात आले, त्यावेळी दिल्लीतील पत्रकारांनी अडवाणींना विचारले की गोवा आपको अनलकी साबीत हुआ क्या? त्यावर अडवाणी उत्तरले… हम यंगस्टर थे, तब से गोवा हमारे दिले मे बसा है, उसे हम कैसे अनलकी ठहरा सकते? नही, नही आपका यह सवाल गलत तरिके का है। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांनी आपल्या हयातीत सामाजिक न्याय, दुर्बल घटकांचे पुनरुत्थान यासाठी खूप संघर्ष केला. वास्तविक त्यांना अनेक वर्षांपूर्वीच भारतरत्न मिळायला हवे होते. मात्र याबाबत आपण 2009 सालापासून मागणी करुनही काँग्रेसने ती पूर्ण केली नाही, आता मोदींनी पूर्ण केली, असे बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी पारंपरिक वाटांबरोबरोबरच नव्या वाटा दाखविणारे माजी पंतप्रधान नरसिंह राव तसेच शेतीच्या विकासाद्वारे देशात सुबत्ता आणण्यासाठी झटणारे, साध्या राहणीमानाचे चौधरी चरणसिंह यांनाही भारतरत्न उशिराच मिळाले. काहीका असेना कृषी संशोधक एस. एम. स्वामीनाथन यांच्यासह ज्या पाचजणांना यंदा भारतरत्न घोषीत करण्यात आले आहे, त्यांच्या जीवनकार्याला न्याय मिळाला हेच खरे!
राजू भिकारो नाईक