जत/प्रतिनिधी
जत तालुक्यातील बिळूर येथे मातेसह तीन मुलींना मानसिक त्रास दिल्याने तलावात उडी टाकून आत्महत्या केली होती. सुरुवातीस बेपत्ता म्हणून नोंद करण्यास गेले असता पोलिसांनी बेपत्ता नोंद न करता चौघींचा शोध घेतला . यावेळी एका तलावात मायलेकीचा मृतदेह आढळून आला होता . या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली होती. पाण्यात बुडून मृत्यू अशी सुरुवातीस नोंद झाली होती.
परंतु मयत सुनिता माळी हिचा भाऊ महादेव माळी यांनी मुली व पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने आत्महत्या केली आहे.अशी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तुकाराम चंद्रकांत माळी यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
आरोपी तुकाराम माळी यास दारूचे व्यसन होते. अनेक वेळा किरकोळ कारणावरून मारहाण करणे व मानसिक व शारीरिक त्रास देणे असे प्रकार चालू होते.या त्रासाला कंटाळून सुनिता तुकाराम माळी (वय.२७), व अमृता तुकाराम माळी (वय .१३),अंकिता तुकाराम माळी (वय.१०), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय.७) यांनी तलावात उडी टाकून आत्महत्या केली होती. ही आत्महत्या करण्यास तुकाराम माळी हे जबाबदार असल्याचा संशय त्यांच्यावर आहे.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबूले पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले , पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर आरोपीला तात्काळ अटक करून न्यायालयासमोर उभा करण्यात आले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.