माणिक साहा नवे मुख्यमंत्री ः विप्लब देव यांचा राजीनामा
नवी दिल्ली, आगरतळा / वृत्तसंस्था
त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी शनिवारी राजीनामा दिला. ते गेली चार वर्षे भाजप, इंडिजिनस पीपल्स प्रंट ऑफ त्रिपुरा सरकारचे नेतृत्व करत होते. राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विप्लब देव यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपने नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली आहे. भाजपने माणिक साहा यांना त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राज्यात आठ महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत असतानाच भाजप हायकमांडने राज्यात नेतृत्त्वबदल केला आहे. 2023 पूर्वी राज्यातील हा मोठा निर्णय मानला जात आहे. विप्लब देव यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहा यांच्यासह अनेक नावांची चर्चा होती. अखेर सर्व नेत्यांनी साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर आता ते शपथ घेऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारू शकतात. कर्नाटक-गुजरातच्या धर्तीवर त्रिपुरामध्ये मंत्री ते संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात. राजीनामा दिल्यानंतर ते संघटनेत कोणते पद स्वीकारणार हे अद्याप कळू शकले नाही.
माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष आहेत आणि ते राज्यसभेचे खासदार देखील आहेत. निवडणुकीच्या अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत पक्षाने त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरातील भाजप नेते पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत होते. त्रिपुरा भाजप संघटनेत विप्लब देव यांच्याबाबत नाराजी होती. दोन आमदारांनीही पक्ष सोडला होता, असे सांगण्यात येत आहे. या सर्व वादांचा ठपका विप्लब देव यांच्या कार्यपद्धतीवर ठेवला जात होता.
विप्लब देव यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती. बैठकीत त्यांना पद सोडण्यास सांगण्यात आले. त्यानुसार शनिवारी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला होता. 2018 मध्ये विप्लब देब यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्रिपुरामध्ये पुढील वषी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी पक्ष बळकट करण्यासाठी भाजपने राज्याची धुरा नव्या चेहऱयाकडे सोपवण्याचा पवित्रा घेतल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. राज्यात पुढील वषी 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत, असे विप्लब देव म्हणाले.
विधिमंडळ बैठकीनंतर काही नेत्यांची नाराजी
विप्लब देव यांच्या राजीनाम्यानंतर सायंकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा झाल्यानंतर माणिक साहा यांचे नाव निश्चित करण्यात आले. या निर्णयानंतर काहींनी नाराजी व्यक्त करत बैठकीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, पक्षनेतृत्त्वाच्या इशाऱयानंतर त्यांनी शांतता पाळली आहे.