संसदीय मंडळाच्या बैठकीत 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस आणि निजदकडून काही मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी शनिवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. यावेळी 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रविवारी पुन्हा बैठक होणार असून उर्वरित मतदारसंघातील नावे निश्चित केली जातील. रविवारी रात्री किंवा सोमवारी उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. त्यामुळे कोणाकोणाला तिकीट जाहीर होणार?, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
चार दिवसांपूर्वी राज्य भाजपच्या निवडणूक समितीने उमेदवार निवडीसाठी दोन दिवस चर्चा केली होती. त्यानंतर उमेदवारांची यादी हायकमांडकडे पाठविली होती. शनिवारी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा व इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्य भाजपने पाठविलेल्या संभाव्य यादीवर विस्तृत चर्चा झाली. चूरस असणाऱ्या आणि बंडखोरी होण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघांमध्ये तोलून-मापून उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा व मतदारसंघनिहाय माहिती आणि पक्षाने केलेल्या सर्वेक्षणांची पडताळणीही बैठकीवेळी करण्यात आली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा हे दोघेही या बैठकीत सहभागी झाले होते. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील हे देखील यावेळी उपस्थित होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्रीपर्यंत किंवा सोमवारी भाजपच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे. मात्र, विद्यमान 15 आमदारांना तिकीट नाकारण्यात येणार असल्याचे समजते. गुजरातच्या धर्तीवर उमेदवार निवडण्याचा निर्णय भाजपश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. 100 मतदारसंघांसाठी यादी अंतिम करण्यात आली आहे. उर्वरित 124 मतदारसंघांत कोणाला तिकीट द्यावे, यावर रविवारच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य दौऱ्यावर असून ते रविवारी बंडिपूर अभयारण्याला भेट देणार आहेत. हा दौरा संपल्यानंतर ते दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्याशी उमेदवार यादीची पडताळणी झाल्यानंतरच रात्री यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. जर उमेदवारांच्या निवडीविषयी गोंधळ झाल्यास दोन टप्प्यात उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
काही विधानपरिषद सदस्यांनीही तिकीट देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये तिकीट वाटपाचा प्रश्न सोडविणे कठीण झाले आहे. काँग्रेस आणि निजदमधून भाजपात येणाऱ्यांना तिकीट द्यावे की नाही, यावरही रविवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षांतर करून आलेल्यांना तिकीट जाहीर झाल्यास आश्चर्य नाही. 13 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. तर 20 एप्रिल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.