ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज देशभरात मतदान होत आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधी गटाकडून यशवंत सिन्हा मैदानात आहेत. आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली असून, महाराष्ट्रात सर्वप्रथम मतदानाचा हक्क काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी बजावला आहे. त्यावर भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी आक्षेप घेतला आहे. माझा नंबर आगोदर असताना राऊत यांनी मतदान केलं. त्यामुळे त्यांचं मत बाद करण्यात यावं, अशी मागणी लोणीकर यांनी केली.
लोणीकर म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून भाजप आमदारांनी हजेरी लावली होती. माझा पहिला नंबर होता. आम्ही एक तास रांगेत उभे राहिलो. पण नितीन राऊत यांनी रांगेत मध्येच येऊन पहिलं मतदान केलं. त्यांनी रांगेत येऊन मतदान करणं आवश्यक होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे त्यांचं मत बाद करण्यात यावं, अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. यासंदर्भातील व्हिडिओ फुटेजदेखील माझ्याकडे उपलब्ध आहेत, असे बबनराव लोणीकरांनी म्हटले आहे.
दरम्यान, बबनराव लोणीकरांच्या आक्षेपावर आता आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार