भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसकडून हाथ से हाथ जोडो अभियान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी विधानसभा निवडणूक आणि 2024 ची सार्वत्रिक निवडणूक पाहता राजकीय पक्षांनी देशाच्या कानाकोपऱयात पोहोचण्याची तयारी केली आहे. भारत जोडो यात्रा पूर्ण केलेला काँग्रेस पक्ष आता हाथ से हाथ जोडो अभियान राबवत आहे. तर अर्थसंकल्पीय घोषणांच्या व्यापक प्रचारासाठी भाजप देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. यानुसार शेतकऱयांपर्यंत अर्थसंकल्पीय घोषणा पोहोचविण्यासाठी भाजप 24 फेब्रुवारीपासून देशव्यापी अभियान सुरू करणार आहे. एक वर्षापर्यंत चालणाऱया अभियानाचे लक्ष्य 1 लाख गावांमध्ये पदयात्रा काढून एक कोटी शेतकऱयांपर्यंत पोहोचणे आहे.
अर्थसंकल्पात सरकारने सेंद्रीय शेती आणि श्रीअन्न (भरडधान्य)वर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. अर्थसंकल्पीय घोषणा शेतकऱयांपर्यंत पोहोचविण्यासाठी 6-12 फेब्रुवारीपर्यंत देशभरात किसान चौपाल (चौकसभा)चे आयोजन होणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राजकुमार चाहर यांनी दिली आहे.
13 फेब्रुवारी रोजी दिल्लीत किसान मोर्चा, सोशल मीडिया आणि नैसर्गिक शेतीशी निगडित टीमचे प्रशिक्षण होणार आहे. राज्यांमध्ये देखील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एक लाख गावांमध्ये जनजागृती यात्रा काढली जाणार आहे. किसान सन्मान निधी योजनेला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 24 फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हय़ांमधील लाभार्थ्यांशी संवाद आणि संपर्क होणार आहे. शेतकऱयांना नदीकाठावर सेंद्रीय शेतीशी जोडण्याची मोहीम राबविली जाणार आहे.
सर्व प्रमुख नद्यांच्या काठावर पदयात्रा काढली जाणार आहे. याची सुरुवात चालू महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवडय़ात उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरपूरच्या शुक्रतालमध्ये भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर करणार आहेत. कर्नाटकात 29-30 जानेवारी रोजी झालेल्या किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत मिशन 2024 साठी शेतकऱयांपर्यंत सक्रीयपणे पोहोचणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अलिकडेच वाराणसीमध्ये पार पडलेल्या तमिळ संगमम कार्यक्रमाच्या धर्तीवर भाजप उत्तर भारतातील कार्यकर्ते तसेच नेत्यांना दक्षिणेतील प्रसिद्ध स्थळांच दौरा करविणार आहे. यात भाजप नेते सांस्कृतिक, धार्मिक आणि स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध स्थळांना भेट देणार आहेत. तसेच स्थानिक लोकांशी संवाद, यात्रा आणि धार्मिक स्थळांना भेट देत दर्शन-पूजन करतील. याचा उद्देश उत्तर आणि दक्षिणेमधील बाँडिंग मजबूत करणे आहे.
आंध्रमध्ये युव गलम यात्रा
आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांना आव्हान देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण यांचा पत्र जनसेनाची तेलगू देसम पक्षाला साथ मिळाली आहे. कल्याण यांनी यापूर्वी राज्याची यात्रा पूर्ण केली आहे. चंद्राबाबू नायडू यांचा तेदेप पुन्हा रालोआत सामील व्हावा अशी कल्याण यांची इच्छा आहे. परंतु भाजप यावर सध्यातरी मौन बाळगून आहे. दुसरीकडे तेदेप महासचिव आणि चंद्राबाबू यांचे पुत्र नारा लोकेश यांनी 4 हजार किलोमीटर अंतराच्या युवा गलम यात्रेला प्रारंभ केला आहे. बंगरुपालयम येथे यात्रा पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांचे वाहन जप्त केले आहे.
केसीआर विरोधात प्रजा प्रस्थानम यात्रा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पक्षाचे नाव बदलत राजकीय महत्त्वाकांक्षा दर्शवून दिली आहे. दुसरीकडे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी शर्मिला रेड्डी यांनी तेलंगणात 2 फेब्रुवारीपासून प्रजा प्रस्थानम पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. तर केसीआर यांच्या विरोधात भाजप 10 फेब्रुवारीपासून 11,500 बैठकांचे आयोजन करणार आहे.