ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून (Andheri East Bypoll) राज्यात घमासान सुरू होते. मात्र आता भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी जाहीर केली होती.
दरम्यान, भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरु झाल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली.
हे ही वाचा : अन्याय होत असेल तर खडसेंनी कोर्टात जावं
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. या जागेवर ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीवरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाले. ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला. शिवसेनेच्या पक्षनावासह चिन्हाचा वाद मुंबई हायकोर्टापर्यंत पोहोचला. त्यामुळे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्यास सांगितलं तर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह देत बाळासाहेबांची शिवसेना हे नाव वापरण्यास सांगितलं. त्यामुळे दोन्ही गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.