पदयात्रेतून मतदारांशी संपर्क : विठ्ठल हलगेकर यांना जांबोटी परिसरातून उत्स्फूर्त पाठिंबा
खानापूर : भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी जांबोटी परिसरात झंझावाती प्रचार दौरा केला. सुरवातीला कणकुंबी माउलीचे दर्शन घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कणकुंबी बाजारपेठ व गावातून पदयात्रा काढत मतदारांशी संपर्क साधत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपाध्यक्ष संजय कुबल, धनश्री सरदेसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लक्ष्मण बामणे, नारायण कालमणकर, रमेश पाटील यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर येथील बाजारपेठेत जाहीर सभा घेण्यात आली. माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देशात विकास होत आहे. यासाठी राज्यात पुन्हा भाजप येणे अत्यंत गरजेचे आहे. खानापूर तालुक्यात गेल्या पाच वर्षात विकास पूर्णपणे खुंटलेला असल्याने तसेच सर्वसामान्य जनतेला कुणी वाली नसल्याची परिस्थिती खानापूर तालुक्यात झाली आहे. यासाठी भूमिपुत्र विठ्ठल हलगेकर यांनाच तालुक्यातील मतदारांनी कौल द्यावा, असे सांगितले. प्रमोद कोचेरी म्हणाले, भाजपने सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधांपासून इतर सुविधा, शेतकऱ्यांना थेट अनुदान यासह सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करूनच देशात व राज्यात भाजप सरकार काम करत आहे. तालुक्यात सर्वसामान्य जनता आज हवालदिल झाली आहे. विठ्ठल हलगेकर हे सर्वसामान्यांचे नेते असल्याने त्यांना मतदान करून निवडून आणावे. तालुका अध्यक्ष संजय कुबल म्हणाले, तालुक्यात गेल्या पाच वर्षात सर्वच थरातून विकास गायब झाला आहे. भाजप सरकारने कोट्यावधीचा निधी खानापूर तालुक्याच्या विकासासाठी दिला. मात्र टक्केवारीत तालुक्याचा विकास खुंटलेला आहे. तालुक्यात विकास आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी विठ्ठल हलगेकर यांना निवडून देऊन भाजपचे कमल तालुक्यात फुलवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कणकुंबी भागातील मतदारांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचे जाहीर केले.