पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाची आठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कार्यक्रम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप-रालोआ सरकार 30 मे 2022 या दिवशी सलग आठ वर्षांचा कालावधी पूर्ण करीत आहे. त्यानिमित्त भाजपने देशव्यापी जनसंपर्क अभियानाची योजना सज्ज केली आहे. सोमवारी येथे भाजपच्या बारा महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत योजनेवर विचार झाला.
या बैठकीला केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, महासचिव अरुण सिंग, सी. टी. रवी आणि डी. पुरंदेश्वरी आदी नेते उपस्थित होते. या बारा जणांना अभियान समितीत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, खासदार विनय राजदीप रॉर, राजू बिस्त, विनय सहस्रबुद्धे आणि अपराजिता सारंगी, तसेच संघटन नेते शिव प्रकाश आणि लालसिंग आर्य यांचाही समावेश आहे.
या सरकारच्या आठ वर्षांच्या पूर्तीनिमित्त देशभरात अनेक स्थानी जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. तसेच या सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये केलेल्या विविध जनहिताच्या कामांची माहिती जनतेला करुन दिली जाणार आहे. या सरकारने गेल्या आठ वर्षांमध्ये क्रियान्वित केलेल्या गरीबांसाठीच्या योजना, जनधन अभियान, विनामूल्य धान्य योजना, निवास योजना, उज्ज्वला योजना इत्यादी कार्यक्रमांचा जनतेला कसा लाभ झाला, याचीही माहिती दिली जाणार आहे. एकप्रकारे ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारीच असेल असे तज्ञांचे मत आहे.