विरोधकांना याचीच धास्ती, म्हणून त्यांचा थयथयाट
वृत्तसंस्था / बिलासपूर
भारतीय जनता पक्ष आणि रालोआ यांच्या सरकारने महिला आरक्षण विधेयक संसदेत यशस्वीरित्या संमत करुन दाखविले आहे. त्यामुळे देशातील सर्व माता-भगिनींचे आशीर्वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपलाच मिळतील अशी धास्ती विरोधकांना वाटते. म्हणून ते थयथयाट करीत आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथे जाहीर सभेत भाषण करीत होते. त्याच्या या भाषणाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात राज्यातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वातील हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेच्या कित्येक समस्यांवर या सरकारपाशी कोणतेही उत्तर नाही. राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात बोकाळला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
साकारण्याचे काम भाजपचेच
गेली 30 वर्षे महिला आरक्षण विधेयक लटकलेले होते. अनेक सरकारे या काळात केंद्रात सत्तेवर येऊन गेली. महिलांच्या पदरी केवळ चर्चेशिवाय काहीही पडले नाही. भारतीय जनता पक्ष आणि रालोआ यांच्या पूर्ण बहुमताच्या सरकारने हे विधेयक साकारले. हे सरकार निर्णय घेणारे आणि निर्णयांचे त्वरित क्रियान्वयन करणारे सरकार आहे. त्यामुळेच महिला आरक्षण साकारले आहे. याची महिलांना पूर्ण कल्पना असून त्यांचे आशीर्वाद आम्हालाच मिळतील. विरोध पक्ष यामुळे घाबरले असून त्यांचा आत्मविश्वास डळमळीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
सावध राहण्याची सूचना
महिलांनी आता सावध रहावे. विरोधी पक्ष भ्रमित करणारे मुद्दे उपस्थित करुन त्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करीत आहेत. नवे खेळ खेळले जात आहेत. महिला आरक्षणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. ज्यांनी महिलांना चर्चेशिवाय काही दिले नाही, ते आता नसलेल्या चुका काढण्यात मग्न आहेत. त्यामुळे महिलांनी सावध रहावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
छत्तीसगडमध्ये अनागोंदी
गेल्या पाच वर्षांमध्ये छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. त्यापूर्वीच्या भाजप सरकारने जी विकासकामे केली होती, त्यांची आज जनतेला आठवण होत आहे. भाजपच्या कल्याणकारी योजनांमुळे येथील गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळत होता. तथापि, नंतरच्या काळात विकासाची गंगा आटली. काँग्रेसच्या राज्य सरकारने सर्व क्षेत्रांमध्ये केवळ दिरंगाईचे धोरण अवलंबिल्यामुळे जनता असमाधानी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
आपल्या स्वप्नपूर्तीसाठीच…
केंद्र सरकार महिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच सर्व प्रयत्न करीत आहे. महिला आरक्षणाच्या निमित्ताने महिलांमध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महिला सूज्ञ असून कोणता पक्ष आपल्यासाठी खऱ्या अर्थाने कार्यरत आहे, याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. भाजपचाही महिलांवर पूर्ण विश्वास असून छत्तीसगडमध्ये यावेळी सत्तांतर होईल आणि भाजपला जनतेची सेवा करण्याची संधीं मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
जनतेचा कौल भाजपलाच…
ड यंदा छत्तीसगडच्या जनतेचा कौल भाजपलाच मिळणार असे प्रतिपादन
ड महिला विधेयकाचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न दिशाभूल करणारा
ड महिलांच्या कल्याणाच्या अनेक योजना भाजपच्याच काळात साकारल्या
ड विरोधकांच्या डावपेचांना महिलांनी भुलू नये, भाजपवर विश्वास ठेवावा