काँग्रेस अयोध्येतील भगवान रामलल्लांच्या भव्य मंदिरावर बुलडोझर चालविणार आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मात्र, हा आरोप खोटा आहे. काँग्रेसची अशी कोणतीही योजना नाही. हा काँग्रेसविरोधातला अपप्रचार आहे, असे विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
केँग्रेसची सत्ता या देशात 55 वर्षे होती. पण आम्ही कोणालाही दुखावले नाही. कोणाच्याही पूजापद्धतीला किंवा धर्मस्थानांना विरोध केला नाही. कोणाचेही मंगळसूत्र काढून घेतले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसविरोधात खोटा प्रचार करीत आहेत. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पूर्वी लोक सुखात होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशात येण्यापूर्वी लोक सुखी होते. तथापि, या सरकारने अशा कृती केल्या की लोकांचे सुख हरविले. या सरकारने समाजाला फोडले आहे. एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात भडकाविले आहे. त्यामुळे देशात अशांतता पसरली, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या धोरणांना विरोध
काँग्रेस सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाने आमच्या प्रत्येक देशहिताच्या धोरणांना विरोध केला होता. रोजगार हमी योजना, बँकांचे राष्ट्रीयकरण, अन्नसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांसंबंधीची धोरणे या सर्वांना या पक्षाचा विरोध होता. त्यामुळे देशाची प्रगती खुंटली, असाही आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.