एका दिवसात 168.8 मिलिमीटर पावसाची नोंद, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यात 6 रोजी देखील पावसाचा जोर कायम राहून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व्यापारी वर्गावरही परिणाम झालेला आहे. चावडीवरील बागायतदार भवन, पालिका मार्केट त्याचप्रमाणे मासळी मार्केटामध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. या तालुक्यात पर्तगाळी, मोखर्ड, शेळेर त्याचप्रमाणे अन्यत्र मासे घेऊन येणाऱ्या कारवार भागातील मासळीविक्रेत्या महिला न आल्यामुळे त्याचप्रमाणे चार रस्ता आणि अन्य भागांत देखील स्थानिक मासेविक्रेत्या न आल्यामुळे खवय्यांची खूपच गैरसोय झाली.
सततच्या पावसामुळे तळपण आणि गालजीबाग नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. संबंधित खात्याचे कर्मचारी तळपण नदीच्या पाण्याची पातळी वारंवार तपासत असून 6 रोजी या नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी सकाळच्या सत्रात 5.55 मीटर इतकी वाढली होती. एकाच दिवसात या तालुक्यात 168.8 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंत या तालुक्यात 44 इंच इतक्या पावसाची नेंद झाली आहे.
रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार
श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील आसाळी या भागात रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबरच डोंगरावरील माती वाहून आली आहे. तामणे, पैंगीण येथे रस्त्याच्या बाजूला असलेले गटार तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचण्याचा प्रकार घडला. योग्य त्या वेळी गटारे साफ न करण्यात आल्यामुळे पाणी साचत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र काणकोणच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळी धावून येऊन रस्ता मोकळा केला. काणकोणच्या मामलेदार कार्यालयातील नियंत्रण कक्ष 24 तास आपत्कालीन सेवेसाठी सज्ज असल्याची माहिती मामलेदार मनोज कोरगावकर यांनी दिली.
चावडीवर पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या सर्व वाटा बंद झाल्यामुळे गोवा बागायतदार भवनाच्या बाजूच्या रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर, सर्वसामान्य नागरिकांवर जसा होत आहे त्याचप्रमाणे स्टेट बँक, समोरच्या औषधालयांवर आणि अन्य दुकानांवर होऊ लागला आहे. रस्ता ओलांडून तेथे जाणाऱ्या नागरिकांवर डोंगरावरून येणाऱ्या लाल पाण्यातून वाट काढत जाण्याची पाळी आलेली आहे. चावडी ही काणकोण पालिका क्षेत्राची जणू राजधानी असून याच वॉर्डाचे नगरसेवक रमाकांत ना. गावकर हे काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष आहेत. ही समस्या सोडविण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील व्यापारी वर्गाने केली आहे.
गुळे हमरस्त्यावरील समस्येचे निराकरण
गुळे भागात राष्ट्रीय हमरस्त्यावर साचणाऱ्या पाण्याला वाट करून देऊन समस्या सोडविण्याचे काम हायवे विभागाने त्वरित केले आहे. त्याच धर्तीवर अर्धफोंड पुलाजवळ जे पाणी साचते त्या पाण्याला वाटा करून देण्याकडे हायवे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. दरवर्षी या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असते. या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर त्याचा जास्त परिणाम होत असताना हायवे विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे किनारी भागांवरही परिणाम झालेला असून भरती रेषा पार करून समुद्राचे पाणी नजीकच्या बागायतींमध्ये घुसले आहे. मात्र कोणत्याच ठिकाणी विपरित घटना घडल्याची नोंद नसल्याची माहिती काणकोण मामलेदार कार्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.