काणकोणवासियांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण
प्रतिनिधी/ काणकोण
गोव्यातील विविध महत्त्वपूर्ण रस्ते प्रकल्पांकरिता केंद्र सरकारने 2 हजार 228 कोटी 78 लाख रु. इतका निधी मंजूर केला असून त्यात माशे ते पोळेपर्यंतच्या बगलरस्त्यावरील 177 कोटी रु., तर बेंदुर्डे ते काणकोणपर्यंतच्या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेवरील 79 कोटी रु. खर्चालाही मंजुरी दिली गेली आहे.
काणकोण तालुक्यातील करमल घाट ते बाळ्ळीपर्यंतच्या रस्त्यावरील जीवघेणी वळणे आणि या मार्गावर वाढलेली मालवाहू वाहतूक यामुळे या रस्त्यावर दिवसाला एक या प्रमाणात मालवाहू वाहने अपघातग्रस्त होऊ लागलेली असून त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात यावे अशी काणकोणवासियांची दीर्घकाळापासूनची मागणी असून सभापती असलेले काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय भूपृष्ठ आणि अवजड वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होतीं आणि या रस्त्याच्या रूंदीकरणाचा विषय लावून धरला होता.
त्यापूर्वी तवडकर यांनी गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्ा्राल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. त्यांनी राष्ट्रीय हमरस्ता विभागाचे प्रधान अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे अन्य अधिकाऱयांच्या वारंवार बैठका घेतल्या होत्या आणि विशेषता काणकोण ते बाळळीपर्यंतच्या रस्त्याच्या रूंदीकरणावर जोर दिला होता. केंद्र सरकारने या कामाला मंजुरी दिल्यामुळे त्यांच्या परिश्रमांना फळ आलेले असून भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित खात्याकडून मिळाली आहे.
चार रस्ता ते माशेपर्यंतचा बगलरस्ता आणि गालजीबाग व तळपण नदीवरील पुलांची कामे झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. त्याचबरोबर माशे ते पोळेपर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण अडल्यामुळे या मार्गावर देखील वारंवार अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. त्याचा विचार करून माशे ते पोळे चेकनाक्यापर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी 177 कोटी रु. इतका निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. हे दोन्ही प्रकल्प लवकरच सुरू होणार असून एक-दोन वर्षात काणकोण तालुक्यातील ही महत्त्वाची समस्या दूर होणार आहे. त्यामुळे काणकोण तालुक्यातून सभापती तवडकर यांचे कौतुक करण्यात येत आहे.
करमल घाट ते बाळ्ळीपर्यंतच्या रस्त्याच्या बाजूला असलेली जवळजवळ 13 हजार इतकी लहान-मोठी झाडे या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी कापावी लागणार असल्याचा मुद्दा समोर करून पर्यावरणप्रेमी आणि करमल घाट बचाव समितीने आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा आणि आवश्यक त्या ठिकाणी बोगदे, उड्डाणपूल यासारखे पर्याय पत्करून रस्त्याचे रूंदीकरण करावे असा प्रस्ताव एका गटाने ठेवला होता. त्यातच काणकोणच्या समविचारी नागरिकांनी नुकतीच एक बैठक घेऊन या रस्त्यावर वाढत असलेले अपघात व वाहतुकीची कोडी यांचा विचार करून आंदोलन करण्याची तयारी ठेवली होती. काणकोणच्या काँग्रेस परिवाराने देखील या प्रश्नावरून महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तप्रसाद कामत यांना घेराव घातला होता.