शिराळा प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील पाऊसाचा जोर सोमवार पासून कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच चांदोली धरण ४९.७४ टक्क्यांपर्यंत भरले असून या धरणाची ३४.४० टीएमसी इतकी साठवण क्षमता आहे. सध्या धरणामध्ये १७.११ टीएमसी इतका पाणी साठा झाला आहॆ. तर तालुक्यात आता पर्यंत ४८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तसेच तालुक्यात बुधवार दिनांक १९ रोजी पाऊसाची नोंद पुढील प्रमाणे कोकरुड ३५.८, मि.मि. शिराळा २४ मि.मि शिरसी ३० मि. मि. मांगले २३ मि.मि.सांगावं ३३ मि.मि. चरणं ७१.८ मि.मि. झाली असून चरणमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
चांदोली धरणात जवळपास पन्नास टक्के पाणी साठा झाला आहे. अद्याप पावसाचा जोर कायम असला तरी ही तालुक्यातील ४९ पाझर तलाव तसेच विहिरी, नदी, नाले, ओढे अजुन ही कोरडेच आहेत. शिराळा तालुक्यात धुळवाफ भात पेरणीची उगवण चांगली होऊ झाली आहे. तर पाऊस अल्प प्रमाणात असल्यामुळे भाताच्या रोपांची लागण मात्र दिवसेंदिवस लांबत चालली आहे.. धुळवाफ भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा लाभ होणार आहे. पावसाने सोमवारी रात्री पासून दमदार हजेरी लावली असल्याने बळीराजा सुखावला आहे. आगाप पेरणी केलेल्या पिकांच्या कोळपणींना सुरुवात झाली आहे. तसेच धुळवाफ भात पेरण्यांची बाळ भांगलण चालू आहेत.
शिराळा तालुक्यात यंदा वळीवाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. सध्या वळीवाची प्रतिक्षा सोडून पुढे खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेती कामे उरकून घेतली होती. तर शेतकर्यांनी धुळवाफ भात पेरण्यासह सोयाबीन, भुईमूगांच्या पेरण्या उरकून घेतल्या होत्या. पावसाने उशीरा का होईना सुरवात केल्याने उगवण ही बर्यापैकी झाली आहे. परंतु गेल्या आठवड्यात पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे माळरानावरील पिके दुपार धरु लागली आहेत. परंतु सोमवार दिनांक १७ पासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. परंतु मुसळधार पाऊस पडला नसल्याने विहिरी, नदी, नाले, ओढे अद्याप ही कोरडेच आहेत. शिराळा पश्चिम भागात भात रोपांची लागण केली जाते. अद्याप शेतात पाणी नसाठल्याने भात रोपांची लागणं लांबणीवर पडली आहे.