जिल्हा परिषदांच्या अनेक शाळांच्या भिंतीवर ‘विद्यार्थी कसा असावा’ याची काही लक्षणे रंगवल्याचे आढळले. अनेक शाळांमध्ये एकसारखीच लक्षणे दिसल्यामुळे त्याबद्दल चौकशी केल्यावर समजले की सरकारी शाळांच्या भिंतीवर लिहावयाचा मजकूर सरकारी आदेशानुसार ठरलेला असतो. सरकारी अपेक्षेनुसार विद्यार्थ्यामध्ये आवश्यक असणाऱया पंधरा गुणांपैकी एक गुण म्हणजे विद्यार्थी ‘आदर्श’ असावा. आदर्श याचा एक ठराविक मापदंड नाही त्यामुळे प्रत्येक शिक्षक, शाळा, गाव, शहर यानुसार तो मापदंड बदलत असतो. डस्टर, खडू तत्परतेने आणून देणारा, फळा पुसून देणारा, शिक्षकांच्या मनातले ओळखून ते सांगतील ती सर्व कामे चपळाईने करणारा विद्यार्थी काही शिक्षकांच्या दृष्टीने आदर्श असू शकतो. वर्गात सर्व प्रश्नांची उत्तरे पोपटासारखी देणारा विद्यार्थी काही शिक्षकांना आदर्श वाटतो. हे असे आदर्श मानलेले विद्यार्थी/विद्यार्थिनी पुढच्या बाकावर बसवलेले असतात. ते विद्यार्थी सहसा ‘ढ’ मानले गेलेल्या विद्यार्थ्यांना आसपास फिरकू देत नाहीत. सहसा अशाच विद्यार्थ्यांना वर्ग प्रतिनिधी नेमले जाते. ते विद्यार्थी दंगा करणाऱया विद्यार्थी/विद्यार्थिनींची नावे इमाने इतबारे शिक्षकांना सांगून त्यांचे अधिक लाडके होण्याचा प्रयत्न करतात. मोठेपणी हेच विद्यार्थी ऑफिसमधल्या बॉसचे लाडके होतात, कारण त्यांच्यावर शालेय जीवनापासून तसे संस्कार झालेले असतात.
एका शाळेत वाचनाची सवय लागण्यासाठी वाचन वर्ग घेत असताना मागच्या बाकावरील एका विद्यार्थिनीला वाचन करण्यास सांगितले तेव्हा त्या वर्गाचे शिक्षक मला म्हणाले, “तुम्ही या तिघांनाच प्रश्न विचारा, ते तिघे हुशार आहेत’’, त्यावर मी शिक्षकांना सांगितले की, ज्याना वाचता येत नाही, त्यांच्याकडूनच वाचून घ्यायचे आहे. यावर शिक्षक म्हणाले, “तुमचाच वेळ वाचावा म्हणून मी विद्यार्थी निवडून दिले. उगाच फुकट वेळ कशाला घालवताय?’’. दुसऱया शाळेमधील सातवीच्या वर्गात एक गोष्ट वाचून घेत होतो. मागच्या पुढच्या वेगवेगळय़ा बाकांवर बसलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला चार वाक्मये वाचण्यास सांगत असताना एका विद्यार्थ्याला पुढील गोष्ट वाचण्यास सांगितले. त्यावर तो विद्यार्थी काही वाचण्याचा प्रयत्न करत असतानाच शाळेच्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मला सांगितले, ‘त्याला वाचायला सांगू नका, तो अप्रगत विद्यार्थी आहे. त्या बाकावर बसलेले तिघेही तसलेच आहेत.’’ इतका जाहीर उद्धार केल्यानंतर तो प्रगत कधी होणार याचीच काळजी वाटली. मुळात शाळेचा उद्देश काय आहे? हुशार विद्यार्थ्यांना शिकवणे की ज्या मुला-मुलींना ज्या विषयात गती नाही, त्यांना बोट धरून पुढे आणणे? प्रत्येक विद्यार्थ्याकडे काही गुण असतात तर काही दोष असतात. रोज त्या विद्यार्थ्यांचे दोष दाखवल्यामुळे त्यांच्या मनोवृत्तीमध्ये सुधारणा होईल का? सगळय़ा विद्यार्थ्यांना आदर्श करण्याचा अट्टहास शिक्षकांनी / शिक्षण व्यवस्थेने का धरावा?
मुळात सगळे विद्यार्थी-विद्यार्थिनी आदर्श, हुशार असतील तर त्यांच्याकडून मार्क जास्त मिळवण्यात शिक्षकांचे कौशल्य ते काय? नियम बनवण्यात आपली काही गफलत होत आहे काय? कोणतीही तक्रार नसलेली पोलीस चौकी उत्तम समजली जाते, शंभर टक्के निकाल लावणाऱया शाळा आदर्श समजल्या जातात. शिक्षण व्यवस्था त्यांच्यासाठी प्रामुख्याने असावी, जे काही विषयात अप्रगत आहेत अशी धारणा आहे, जे विपरीत परिस्थितीमध्येही आपले कौशल्य दाखवू शकतात, जे लिखाणामध्ये अप्रगत असतील परंतु उत्तम वाचू शकतात, जे वाचनामध्ये मागे असतील परंतु कोणत्याही कलेमध्ये पारंगत होण्याची शक्मयता आहे. कोणतेही मुल ‘ढ’ नसते, प्रत्येक मुला-मुलीकडे काहीतरी कौशल्य असतेच यावर शिक्षणव्यवस्थेचा विश्वास असावा. परंतु आताची शिक्षण व्यवस्था फक्त आदर्श विद्यार्थ्यांसाठीच आहे का?
शासकीय नियमाप्रमाणे शाळांच्या भिंतीवर लिहिलेले अन्य गुण तो म्हणजे विद्यार्थी नम्र, स्वाभिमानी असावा. कायम प्रश्न विचारणारा विद्यार्थी नम्र या व्याख्येत बसत नाही. ‘मी शेंगदाणे खाल्ले नाहीत, मी सोलपटे उचलणार नाही’ असे शिक्षकांना निक्षून सांगणाऱया टिळकांच्या स्वाभिमानी ‘बाळ’चा आज्ञाधारक-नम्र विद्यार्थी असा सत्कार शाळेत झाला असेल का? ‘परोपकारी, शिस्तप्रिय, प्रेमळ, काकदृष्टी, संग्राहक, सुविचारी असे अनेक गुण या फलकावर लिहिलेले दिसतात. अशा अनेक गुणांमध्ये विरोधाभास आहे. परीक्षा सुरु असताना मित्रास मदत करणे परोपकार असेल परंतु तो शिस्तभंग ठरतो. एखाद्या विद्यार्थ्याने चित्रपट कलाकारांचे फोटो जमवले असतील तर त्याला काही शिक्षकांच्या दृष्टीने संग्राहक मानले जाणार नाही. वर्गामध्ये उत्तरे देणारा विद्यार्थी आदर्श की प्रश्न विचारणारा? आकाशाचा रंग कोणता, या प्रश्नावर ‘निळा’ हे पोपटपंची उत्तर देणारा विद्यार्थी आदर्श की ‘करडा, नारंगी, काळा, पांढरा’ अशी उत्तरे देणारी कल्पक विद्यार्थीनी? शिक्षकांना अपेक्षित उत्तर न दिल्यामुळे ‘कल्पक’ हा तिचा गुण न ठरता ‘उद्धट’ अशी संभावना शाळेमध्ये होऊ शकते. ‘आज्ञाधारक’ हा असाच एक आदर्श विद्यार्थ्याचा गुण मानला जातो. इंग्रजी मुळाक्षरे शिकताना प्रत्येक मुळाक्षर पन्नासवेळा लिहून आणण्यास सांगितले होते. त्यावेळी एका विद्यार्थ्याने अशी मुळाक्षरे असलेले पन्नास वेगवेगळे शब्द लिहून आणल्यानंतर शिक्षकांनी त्याची भरवर्गात जाहीर हेटाळणी केली. राष्ट्रप्रेमी आणि स्वाभिमानी असे आदर्श विद्यार्थ्याचे गुण असल्याचे सरकारी शाळांमध्ये लिहिले आहे. सत्ताधारी व्यवस्थेला प्रश्न विचारणारा विद्यार्थी राष्ट्रप्रेमी असेल परंतु त्यांची संभावना राष्ट्रद्रोही केली जाते.
वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक नागेश मोने यांनी एकापेक्षा एक अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणून अनेक बदल घडवून आणले आहेत. या शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या केबिनबाहेर बोर्ड लावला आहे, “विद्यार्थ्याना परवानगीशिवाय प्रवेश आहे’’. या एका बोर्डमुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलली आहे. विद्यार्थी शाळेविषयी कोणतीही शंका असेल, कोणतीही सूचना असेल, तर तो विचारण्यासाठी मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी बिनधास्त केबिनमध्ये येतात. कोणतीही मिटिंग सुरु असली तरी मोनेसर ती थांबवून आतमध्ये आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनीची विचारपूस करतात, त्यावर विद्यार्थी त्यांचे प्रश्न विचारतात, भन्नाट आयडीया सुचवतात. आदर्श शाळा होण्यासाठी असेच चौकटीबाहेर विचार करणे गरजेचे आहेत.
नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कसा करावा, यावर मार्गदर्शन करताना मी विद्यार्थ्यांना वेगळय़ाच विषयावर निबंधाचे मुद्दे काढण्यास सांगतो. ज्या विषयांवर त्यांनी यापूर्वी निबंध लिहिलेले नसतील, ज्याचे तयार निबंध बाजारात मिळणाऱया गाईडमध्ये नसतात, त्या विषयावर मुद्दे काढताना कल्पक विद्यार्थ्यांचे कसब पणाला लागते. एकदा एका शाळेतील विद्यार्थ्यांना सांगितले की समजा तुम्हाला शाळेचे मुख्याध्यापक केले, तर शाळेमध्ये प्रवेश करताना असलेल्या फलकावर मुख्याध्यापक या नात्याने विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सूचना लिहाल? यावर तथाकथित पोपटपंची करणारे विद्यार्थी, ‘सर्वांनी शांत बसावे’, ‘दंगा करू नये’, ‘शाळेची शिस्त मोडू नये’ अशी ठरलेली साचेबद्ध उत्तरे देतात. यावर मी त्यांना सांगितले की “तुम्हाला मुख्याध्यापक केले तर तुम्ही वेगळे काय करणार आहात? वेगळे काही करणार नसाल तर तुम्हाला मुख्याध्यापक करून उपयोग काय?’’ यावर मुलांनी वेगळा विचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर येणारी उत्तरे खरंच नाविन्यपूर्ण होती. “शाळेत उशिरा येणाऱया विद्यार्थ्यास येथे छडय़ा मारल्या जाणार नाहीत’’, “वेगळे प्रश्न विचारणाऱयास बक्षीस दिले जाईल’’, “प्रत्येक महिन्यात एकदा चित्रकलेची स्पर्धा घेतली जाईल’’, अशी वेगळी उत्तरे देणारी मुले कदाचित वर्गात सर्वोत्तम मार्क मिळवणारी नसतील, पण संधी मिळाल्यानंतर डोके चालवणारी नक्कीच असतात.
माहिती आणि ज्ञान मिळविण्यासाठी वेगवेगळय़ा पद्धतीने डोके चालवून प्रश्न विचारणारे विद्यार्थी तयार करणारे, स्वतः विचार करणारे, वेगळा विचार करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी तयार करणारी शिक्षण व्यवस्था तयार करणे हे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे. असा वेगळा विचार करणारा विद्यार्थी वर्ग सरधोपटपणे डॉक्टर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, सरकारी नोकर होण्याचा विचार न करता वेगळय़ा वाटा शोधेल, वेगळे शिक्षण घेईल. त्याचवेळी साचेबद्ध उत्पादन करणारी कारखाने सदृश शिक्षण व्यवस्था बदलून उपक्रमशील युवक तयार होतील आणि विचार करणारा वेगळा समाज तयार होईल. त्याची पाळेमुळे शाळेतच रोवली जातात. म्हणूनच तर्कशुद्ध विचार करायला शाळेत शिकवणे गरजेचे आहे. त्याचीच आता वानवा आहे.
-सुहास किर्लोस्कर