‘आप’चे आमदार वेन्झी व्हिएगस यांची मागणी
प्रतिनिधी/ मडगाव
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हादई वाद सोडवण्यासाठी भाजपच्या गोवा सरकारला विश्वासात घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना उघडे पाडून गेले आहे. म्हादईच्या पाण्याचा एक थेंबही वळवण्यापासून रोखण्याकरिता आपले सरकार लढेल आणि यशस्वी होईल या सावंत यांच्या वक्तव्यांचा हे विधान पर्दाफाश करते, अशी टीका बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी स्वाभिमान बाळगून पायउतार व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्वतःला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आणखी किती खोटे बोलणार आहेत, असा सवाल आमदार व्हिएगस यांनी केला आहे. म्हादईसंदर्भात भाजप आणि त्यांच्या सर्व इंजिनांची वृत्ती घृणास्पद आहे. म्हादई ही वन्यजीव अभयारण्य तसेच पश्चिम घाटासाठी आणि गोमंतकीयांसाठी जीवनदायिनी आहे. कायद्याच्या राज्याचा अवमान करून नदीचे पाणी लहरीपणे वळविण्यास म्हादई ही अमित शहा, प्रमोद सावंत, बसवराज बोम्मई किंवा अगदी केंद्र सरकारचीही खासगी मालमत्ता नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
म्हादईसाठीच्या गोव्याच्या लढय़ात आता सर्वांकडून आणखी दृढनिश्चय आवश्यक आहे. आम्ही आता आणखी जोमाने लढू. हे स्पष्ट झाले आहे की, म्हादईचे शत्रू कोण आहेत. आम्हाला माहीत आहे की, यात गोवा, कर्नाटक आणि केंद्रातील भाजपची सरकारे सामिल आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. म्हादई बचावसाठीचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आमदार व्हिएगस यांनी व्यक्त केली आहे.