मजगाव : मजगावच्या ग्रामस्थांनी तलावातील गाळ स्वखर्चाने काढला. गाव पंचकमिटीने शेतकऱ्यांची बैठक घेवून श्री ब्रम्हदेव मंदिरासमोरील तलावातील गाळ काढण्याचे ठरविले. गेल्या पंधरा वर्षात तलाव कधी संपूर्ण रिकामा झाला नव्हता. परंतु यावर्षी होळीपूर्वीच रिकामा झाल्याने त्यामधील गाळ काढण्याचे ठरवून कार्यवाही करण्यात आली. अनेक वर्षापासून सदर तलावामध्ये मजगाव परिसरातील श्री गणेश विसर्जन केले जातात. त्यामुळे तलावात दलदल साचली होती. वारंवार महानगरपालिकेकडे व लोकप्रतिनिधींकडे समस्येबद्दल तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून तलाव स्वच्छ केल्यामुळे मजगावच्या पंच कमिटीचे व ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. मंदिरासमोर असलेल्या तलावाचे सुशोभिकरणाचे काम फक्त ठरावापुरतेच होत असते. परंतु अद्याप त्याला मुहूर्त न सापडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व तलावांचे सुशोभिकरण झाले आहे. मात्र मजगावलाच वगळण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. श्री विसर्जन तलाव निधी मंजूर असून तो वापरला गेला नाही. त्यामुळे जाणूनबुजून मजगावकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी पाहणी करून तलावाची खोली वाढवून त्याचे सुशोभिकरण करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी पंचकमिटीने मागणी केली आहे. यावेळी प्रमुख पंच शिवाजी पट्टण, बी. डी. कुडची, सावंत, पुजार, श्रीपाल, सातगौडा, तात्यासाहेब सुतार, देवाप्पा बांडगी, मलसर्ज सनदी, चांगाप्पा मजूकर, नाभिराज धुळाई, रवि पाटील, कल्लाप्पा सातगौडा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.