पुणे / प्रतिनिधी :
राज्य शासकीय कार्यालयांमधील ‘गट क’ मधील लिपिक आणि टंकलेखक पदांची भरती आता राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणार आहे. राज्य शासकीय कार्यालयातील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे यापुढे आयोगामार्फत भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासंबंधीचा शासकीय अध्यादेश बुधवारी प्रसृत करण्यात आला.
‘गट क’ मधील लिपिक आणि टंकलेखक संवर्गातील पदे यापूर्वी दुय्यम सेवा निवड मंडळाच्या माध्यमातून भरली जात होती. नामनिर्देशनाच्या कोट्यातील ‘गट ब’ (अराजपत्रित), ‘गट क’ आणि ‘गट ड’ संवर्गातील सरळ सेवा पदभरती जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समित्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती. दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील सरळ सेवेने भरावयाची ‘गट क’ मधील लिपिकवर्गीय संवर्गातील पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेली कार्यपद्धती सर्व लिपिकवर्गीय पदभरतीसाठी लागू राहील. त्यापैकी पहिल्या टप्प्यात बृहन्मुंबई आणि बृहन्मुंबईबाहेरील लिपिक-टंकलेखक पदांची भरती करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी