केवळ पावसाचा शिडकावा : उष्म्याने सारेच हैराण
बेळगाव : उष्म्यामध्ये वाढ झाली आहे. याचबरोबर गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. केवळ पावसाचे थेंब पडले आणि पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे साऱ्यांनाच दिवसभर व रात्रभरही उष्म्यामुळे घालमेल झाली. पाऊस मोठा पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा साऱ्यांचीच भंग झाली. आठ दिवसांपूर्वी वळिवाचा पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. उष्मा वाढ झाल्याने वळीव पाऊस पडेल, अशी अपेक्षा साऱ्यांचीच होती. मात्र सध्या तरी पावसाने दडी मारल्याने ही अपेक्षा भंग होत आहे. महत्त्वाचे म्हणजे उन्हाचा तडाखा वाढला आहे. यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने साऱ्यांच्याच अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. या उष्म्यामुळे फॅन, एसी याचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच थंड पेयाकडेही नागरिकांचा कल वाढला आहे.
वळिवाचे पाऊस झाले तर साऱ्यांनाच दिलासा मिळणार आहे. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाऊस कोसळला तर काही प्रमाणात पाणीटंचाई दूर होणार आहे. अन्यथा पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या काही गावांमध्ये टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. काही प्रमाणात असलेले पाणीही कमी होणार असल्याने मे महिना हा अत्यंत कष्टाचा ठरणारा आहे. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालत आहे. वळिवाचा पाऊस झाला तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीमध्ये मशागत करणेही सोपे जाणार आहे. मात्र आठ दिवसांपूर्वी झालेल्या वळिवानंतर आतापर्यंत तरी दडी मारल्याने साऱ्यांच्याच चिंता वाढल्या आहेत. यावर्षी उष्मा वाढल्याने दमदार पाऊस कोसळतील, असे साऱ्यांना वाटत होते. मात्र केवळ वादळीवाऱ्यांसह पावसाचा शिडकावा झाला. दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे आता मोठ्या पावसाचीच साऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे.