पुणे/ प्रतिनिधी :
पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घटणार असून, त्यानंतर ते कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा थंडी परतणार आहे. दरम्यान, सोमवारी औरंगाबाद येथे सर्वांत कमी 11.8 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
वायव्येकडील काही भागांत सुरू असलेला पाऊस मंगळवारनंतर कमी होणार आहे. तसेच उत्तरेकडे सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यात थंड वाऱ्यात वाढ होणार असल्याने महाराष्ट्र तसेच गुजरामधील किमान तापमानाचा पारा पुन्हा खाली येणार आहे. दरम्यान, गेला आठवडाभर राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला होता. तसेच काही भागातील ढगाळ वातावरणामुळे थंडी गायबही झाली होती. मात्र, आता ही स्थिती बदलली आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता पुन्हा वाढणार आहे.
बंगालच्या उपसागरात न्यून दाबाचे क्षेत्र
दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात न्यून दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, 1 फेब्रुवारीला ते श्रीलंका किनारपट्टीला धडकणार आहे. याच्या प्रभावामुळे केरळ तसेच तामिळनाडू राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.