महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमध्येच कुजबुज : मनपा आयुक्त लक्ष देणार का?
बेळगाव : प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई केली होती. त्यांच्याकडून दंड वसूल केला होता. याचबरोबर परवाना नसलेल्या दुकानदारांकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र तो दंड सरकारला भरण्यात आला का? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून आणि व्यावसायिकांतून उपस्थित होत आहे. कारण ही दंडाची रक्कम परस्पर लांबविल्याची जोरदार चर्चा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येच सुरू आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे या प्रकरणाचा छडा लावणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्लास्टिकवर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारने आदेश दिला होता. त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी दुकानांवर धाडी टाकून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. याचबरोबर प्लास्टिकही जप्त केले. ही मोहीम तब्बल तीन महिने राबविण्यात आली. मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. ज्यांनी परवाना घेतला नाही त्या दुकानांवरही कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र दंड वसूल केल्यानंतर अनेक दुकानदारांना दंडाची पावतीच दिली गेली नाही. त्यामुळे निश्चित दंड सरकारला भरला गेला का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काही अधिकाऱ्यांनी तर दंडाची अधिक रक्कम सांगून व्यावसायिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. पावती हवी असेल तर अधिक रक्कम, पावती नको तर कमी रक्कम देऊन परस्पर अशी अनेक प्रकरणे मिटविल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. एका अधिकाऱ्याने दुकानदारावर कारवाई केली होती. त्याचठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याने दंडाची रक्कम घेतली होती. त्यामुळे दुकानदाराने संबंधिताकडे मी दंडाची रक्कम दिली आहे, असे त्या अधिकाऱ्याला सांगितले. एकूणच दंड वसुलीमध्ये मोठे गौडबंगाल असून महापालिका आयुक्त यावर कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दंड गेला खिशात…
आजपर्यंत किती दंड वसूल झाला? तो दंड कोठे भरण्यात आला आहे? याची चौकशी करणे गरजेचे आहे. कारण अनेक कर्मचारी दंड वसूल करून तो आपल्याच खिशात घालत असल्याची चर्चा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येच सुरू आहे. त्यामुळे अशोक दुडगुंटी हे या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.