आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा : तिलक वर्माची सरप्राईज एंट्री :रोहितकडे नेतृत्वाची धुरा कायम : धवन, चहल, अश्विनला डच्चू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, मुंबई
आशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने सोमवारी टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सतरा खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीमुळे गेले काही महिने संघाबाहेर असलेल्या केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यरची भारतीय संघात कमबॅक झाले आहे. युवा फलंदाज तिलक वर्मालाही संघात संधी देण्यात आली असून विकेटकिपर आणि फलंदाज संजू सॅमसनची स्टॅंडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
मागच्या काही आठवड्यांपासून आशिया चषक संघाच्या चर्चा सुरू होत्या. सोमवारी (21 ऑगस्ट) आशिया चषकासाठी भारताचा संघ घोषित केला गेला. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. तब्बल 7 वर्षांनंतर पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा पहिलाच सामना कँडी येथे पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेंबरला होईल. यानंतर 4 सप्टेंबर नेपाळविरुद्ध भारतीय संघाचा दुसरा सामना होईल. आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एकाच ग्रुपमध्ये आहेत.
श्रेयस अय्यर, केएल राहुलचे कमबॅक
विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांची दुखापतीनंतर टीममध्ये एंट्री झाली आहे. श्रेयसला गेल्या अनेक महिन्यांपासून पाठदुखीचा त्रास जाणवत होता. तर केएल राहुलला आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती. यानंतर दोघांनी एनसीएमध्ये कमबॅकसाठी कठोर परिश्रम घेतले होते. या दोघांची आशिया कपसाठी निवड होणार की नाही, याबाबत चर्चा सुरु होत्या मात्र अखेर हे दोघे परतले असल्याने टीम इंडियासाठी ही आनंदाची बाब आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयर्लंड दौऱ्यात तब्बल 11 महिन्यांनंतर मैदानात पुनरागमन केले. बुमराह देखील आशिया चषकाच्या संघाचा भाग आहे.
तिलक वर्माची सरप्राईज एंट्री
तिलक वर्माने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण आयर्लंडविरुद्ध त्याची बॅट शांत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, तिलकने एकही वनडे सामना खेळलेला नाही तरीही त्याला संघात सरप्राईज एंट्री मिळाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र त्याने धमाकेदार कामगिरी साकारली असून या कामगिरीच्या जोरावर त्याला विंडीज दौऱ्यात स्थान मिळाले होते. रोहित आणि गिल भारतासाठी सलामीवीराच्या भूमिकेत दिसतील. विराट तिसऱ्या क्रमांकावर उत्तम पर्याय असून श्रेयस अय्यर किंवा केएल राहुल यांच्यातील एकाला चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी निवडले जाईल. ईशान किशनला 17 सदस्यीय संघात घेतले गेले आहे. संजू सॅमसन आशिया चषकात राखीव खेळाडू म्हणून असेल.
फिरकीपटूंमध्ये रविचंद्रन अश्विनचेही नाव आशिया चषकासाठी चर्चेत होते. मात्र, अश्विनला वगळण्यात आले असून याचसोबत युझवेंद्र चहल, सलामीवीर शिखर धवन देखील आशिया चषकासाठी संघात स्थान मिळवू शकला नाही. फिरकीची धुरा रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आणि कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. तसेच संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी हे चौघे वेगवान गोलंदाज असतील.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा. राखीव खेळाडू – संजू सॅमसन.
केएल राहुल सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता
भारतीय संघाची घोषणा करताना मुख्य निवडकर्ते अजित आगरकर म्हणाले की, ‘केएल राहुल अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आशिया चषक स्पर्धेतील सुरुवातीचे एक-दोन सामने तो खेळू शकणार नाही. परंतु, श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे.श्रेयसला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. ही खूप चांगली बातमी आहे. राहुल अजूनही पुर्णपणे बरा झाला नाही. परंतु, दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी आम्हाला आशा आहे. अशा परिस्थितीत आम्ही बॅकअप खेळाडू म्हणून संजू सॅमसनचा संघात समावेश केला आहे.
चहल, अश्विन संघाबाहेर
संघ निवडीदरम्यान लेगस्पिनर आणि ऑफस्पिनर दोघांसाठी चर्चा झाली होती, पण आम्हाला अशा खेळाडूची निवड करायची होती, जो 8 किंवा 9 वर क्रमांकावर गोलंदाजीसोबत फलंदाजी करु शकतो.अक्षर पटेलने या वर्षात खूपच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याला संघात घेतल्याने आम्हाला डावखुऱ्या फलंदाजाचा फायदाही मिळणार आहे. संघ निवडताना आम्ही अश्विन आणि चहलबद्दल देखिल चर्चा केली. परंतू संघात केवळ 17 खेळाडूंना घेता येणार आहे. यामुळे संघात चहलला संघात स्थान देणे कठीण झाले, असे रोहित पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला.
धवनसाठी पुनरागमन कठीण?
शिखर धवन सध्या 38 वर्षांचा आहे. त्याने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो वनडे फॉरमॅटमध्येही टीम इंडियाच्या बाहेर आहे. संघनिवडी दरम्यान आगरकर यांना विचारले असता, धवनने गेल्या काही वर्षांपासून भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे, परंतु सध्या रोहित शर्मा, शुबमन गिल आणि इशान किशन हे सलामीवीर आहेत. यामुळे आगरकर यांच्या या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की, धवनसाठी तूर्तास टीम इंडियात पुन्हा एन्ट्री करणे सोपे जाणार नाही.