अनुजा कुडतरकर–
हो…. या शहराचं नाव आहे सावंतवाडी . पूर्वी या शहराला ”सुंदरवाडी” या नावाने संबोधलं जायचं . निसर्गाच्या कुशीत वसलेलं , तसेच शांत, सुसंस्कृत शहर म्हणून या शहराची ओळख आहे .आणि ती ओळख इथल्या माणसांनी जपूनही ठेवलीय बरं का ! महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेलं हे एक निसर्गसंपन्न शहर. सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे . सावंतवाडी हे पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे राजधानीचे शहर होते. उदयपूरच्या सिसोदिया घराण्याच्या मांग या तरुणाने सुंदरवाडी परिसरात रोजगारासाठी वास्तव्य केल्यावर सावंत – भोसले हे उपनाव लावले . त्याचा मुलगा फोंड सावंत हाही वडिलांप्रमाणे आदिलशाहीत नोकरी करीत होता . त्याचा मुलगा खेम सावंत प्रथम याने १६२७ मध्ये आदिलशाहीकडून देशमुखी मिळवली आणि खेम सावंतांनी सावंतवाडीच्या आसपासचा काही प्रदेश घेऊन आपले राज्य स्थापन केले .
सावंतवाडीच्या सुंदरतेत भर घालणारं ठिकाण म्हणजे शहराच्या मध्यभागी स्थिरावलेला मोती तलाव . अनेकांच्या ह्रदयात स्थान मिळवणारा हा तलाव सावंतवाडी शहराचा खऱ्या अर्थाने आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सावंतवाडी शहरात येणारा प्रत्येक पर्यटक या मोती तलावाला आवर्जून भेट देतोच. आणि तलावाच्या या काठावर बसून सुख दुःखाच्या गोष्टी करतो. जाता जाता तळ्याकाठी काढलेला फोटो आयुष्याच्या मेमरीत तो कायम जपून ठेवतो. तलावालगतच असलेला राजवाडा इतिहासाची साक्ष देत डौलाने उभा आहे . हा राजवाडा ज्यांनी पहिला नाही त्यांची सावंतवाडी शहराची ट्रिप पूर्ण होऊच शकत नाही . या राजवाड्यामध्ये श्री देव पाटेकरांचं जागृत देवस्थान आहे . हा राजवाडा देश विदेशातील पर्यटकांना कायम भुरळ घालतो.
”लाकडी खेळण्याचं शहर ”अशी ओळख सावंतवाडी शहराची आहे. विविध प्रकारची लाकडी खेळणी पपर्यटकांना आपल्याकडे खुणावतातच. ज्यांना शांततेचा अनुभव घ्यायचाय त्यांच्यासाठी अजून एक या शहरातील अनुकूल ठिकाण म्हणजे नरेंद्र डोंगर. घनदाट अरण्य असलेला हा डोंगर शांततेची अनुभूती देतो. सावंतवाडी शहरात प्रवेश केल्यावर अनेक हॉटेल्स पर्यटकांची भूक भागवण्यासाठी सज्ज आहेत . अस्सल कोकणी मेजवानीचा स्वाद इथल्या हॉटेल्स मध्ये अनुभवायला मिळतो. अशा प्रकारे सर्वाना आपल्या प्रेमात पाडणारे हे शहर, कायमच मनाच्या कप्प्यात आपलं अढळ स्थान मिळवून जातं यात शंकाच नाही !