उद्योग खात्रीतून कामाला सुरुवात : नाल्यावरील अतिक्रमण हटविले
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीपासून रेल्वेमार्गाकडे जाणाऱया नाल्यामध्ये अतिक्रमण करण्यात आले होते. गावापासून काही अंतरावरील हा नाला पूर्णपणे काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे पावसाळय़ात पाण्याचा निचरा होत नसल्याने ग्राम पंचायतच्या माध्यमातून नाल्याची खोदाई करण्यात आली. नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले असून रोजगार हमी योजनेंतर्गत याचे काम सुरू करण्यात आले आहे.
लक्ष्मी तलावापासून सिद्धेश्वर गल्लीमार्गे शिवारातून हा नाला गेला होता. मात्र, काही शेतकऱयांनी अतिक्रमण करून तो नालाच लुप्त केला. त्यामुळे शिवारात प्लास्टिक, डेनेजचे पाणी तसेच इतर कचरा जाऊन मोठे नुकसान होत होते. बऱयाच वर्षांपासून या नाल्याची खोदाई करण्याची मागणी शेतकऱयांतून होत होती.
याबाबत ग्राम पंचायतीच्या निदर्शनाला ही बाब आणून देण्यात आली. त्यानंतर संबंधित खात्याचे सर्वेक्षण अधिकारी, तलाठी यांनी शेतकऱयांना विश्वासात घेऊन या नाल्याचे काम सुरू केले. उद्योग खात्री योजनेच्या माध्यमातून या कामाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य रमेश मेणसे, सदस्य प्रमोद पाटील, जोतिबा पाटील, राकेश परीट, विलास बेडरे, दयानंद उघाडे, राजू डोण्याण्णावर, पीडीओ अरुण नाईक, तलाठी मयूर मासेकर, ग्रा. पं. माजी सदस्य बाबुराव मुरकुटे, शिवाजी गोरल यांच्यासह ग्रा. पं. कर्मचारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.