जळगाव / प्रतिनिधी :
विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांना मंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली असून, मंत्रीपदासाठी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातून सेना आमदारांचे कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.
शिंदे गटातील शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. आज विधानसभेत बहुमतही सिध्द केले. जळगाव जिल्ह्यातून निवडून गेलेले पाचही शिवसेनेचे बंडखोर आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. भाजप देखील सत्तेत सहभागी असल्याने आता भाजपकडून गिरीश महाजन यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चितपणे मानले जाते. जळगावचे पालकमंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे या सरकार सोबत आहेत. त्यांना देखील मंत्रीपद मिळू शकते. या शिवाय पाचोरा येथील आमदार किशोर पाटील आणि एरंडोल मतदासंघातील आमदार चिमणराव पाटील हे प्रथमपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने त्यांना मंत्रीपद अपेक्षित आहे. या दोघात मंत्रीपदाची स्पर्धा दिसून येत आहे. गुलाबराव पाटील, किशोर पाटील आणि चिमणराव पाटील यांनी आपले समर्थक मुंबईत बोलावल्याने यांच्या शेकडो समर्थकांनी मंत्रीपद शक्तिप्रदर्शनासाठी मुंबईकडे धाव घेतली आहे.
भाजपचे गिरीश महाजन यांचे मंत्रीपद निश्चित असून, सेनेचे गुलाबराव पाटील यांचे आज असलेले मंत्रीपद कायम राहू शकते. जिल्ह्यातील पाच सेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले असले तरी या सर्वांना मंत्रीपद मिळणे कठीण आहे. किशोर पाटील हे शिंदेंना अधिक जवळचे आहेत. सेनेचे पाचही मंत्रीपदासाठी उत्सुक असले तरी जिल्ह्याला किती मंत्रीपदे द्यायची हा प्रश्न समोर आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांसमोर मंत्रीपदासाठी केवळ शक्तिप्रदर्शन हा एकमेव पर्याय असून, त्यासाठी या आमदारांच्या समर्थकांनी दबावतंत्रासाठी मुंबईचा रस्ता धरला आहे.