भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे सुजित मुळगुंद यांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कंत्राटदार संतोष पाटील (वय 35) यांच्या आत्महत्या प्रकरणाची निःपक्षपात चौकशी व्हावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी केली आहे. भ्रष्टाचारामुळे कंत्राटदाराचा जीव गेला आहे. सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, असेही त्यांनी म्हटले
आहे.
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात संतोष पाटील यांनी केलेली कामे स्मार्ट सिटीच्या कामांपेक्षाही उत्कृष्ट दर्जाची झाली आहेत. हवे तर कामांची तुलना करण्यासाठी त्याची पाहणी करावी. उत्तम दर्जाची कामे करूनही कमिशन दिले नाही म्हणून त्यांची बिले अडविणे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशी भूमिका मांडली आहे. त्यांच्या भूमिकेला विसंगत असे प्रकार येथे घडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
संतोष पाटील यांच्या आत्महत्येला मंत्री के. एस. ईश्वरप्पा हेच जबाबदार आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी करावी. 40 टक्के कमिशन मागणाऱया मंत्री व इतरांची नावे लिहून त्यांनी हे पत्र थेट पंतप्रधानांकडे पाठविले होते. या पत्राची दखल घेतली असती तर कदाचित कंत्राटदाराचा जीव वाचला असता. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी सुजित मुळगुंद यांनी केली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते राजू टोपण्णावर व सुजित मुळगुंद यांनी कंत्राटदारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.