राहुल गांधींच्या अपात्रतेवरून काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन ः आरोपांना भाजपचे रोखठोक प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसने रविवारी देशभरात सत्याग्रह आंदोलन छेडले. प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन यांसारखे बडे नेते पहाटेच राजघाटावर पोहोचले होते. या आंदोलनाला उपस्थित प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर आगपाखड व्यक्त केली. त्यानंतर भाजपने काँग्रेसच्या आरोपांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘दोरी जळली तरी, पीळ सुटला नाही’ अशी खोचक टिपण्णी केली आहे. तसेच भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही काँग्रेसवर जोरदार प्रहार केला आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी रविवारी ट्विटरवर आपला बायो बदलत स्वतःला ‘अपात्र खासदार’ म्हणवून घेतले आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यावर काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा सचिवालयाने 24 मार्च रोजी राहुल गांधी यांना ‘खासदार’ म्हणून अपात्र ठरवले होते. राहुल केरळमधील वायनाडमधून खासदार होते. मानहानीच्या एका प्रकरणात राहुलला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 2019 मध्ये राहुल यांनी कर्नाटक दौऱयावर असताना मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शब्दयुद्ध सुरू झाले आहे.
काँग्रेसकडून देशभर आंदोलन सुरू असून राजघाटावरील सत्याग्रह आंदोलनात सहभागी झालेल्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आजपर्यंत आम्ही गप्प बसलो, त्यामुळे तुम्ही आमच्या कुटुंबाचा अपमान करत राहिलात. मला विचारायचे आहे की तुम्ही माणसाचा किती अपमान कराल. माझ्यावर गुन्हा दाखल करा, पण या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत हे सत्य नाकारता येणार नाही, असे त्या म्हणाल्या.
…हा सत्याग्रह न्यायालयाविरोधात! ः भाजपचा आरोप
काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनादरम्यान भाजपने प्रियांकाच्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेत प्रियांकांचा ‘समाचार’ घेतला. राहुल यांची खासदारकी कायद्यानुसार गेली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस सत्याग्रह करत आहे. सत्याग्रहाच्या नावाखाली हा धर्मांधपणा आहे. गांधी घराणे स्वतःला कायद्यापेक्षा वरचे समजते, असे त्रिवेदी म्हणाले. राहुल गांधी कायद्याचा आदर करत नाहीत. आपल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली असती तर कदाचित आज त्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते. 2019 मध्ये चौकीदार चोर है या विधानासाठी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयात लेखी माफी मागावी लागली होती, पण तरीही राहुल आपल्या कृत्यांपासून परावृत्त झाले नाहीत, असेही ते पुढे म्हणाले.
विविध राज्यातही सत्याग्रह आंदोलन
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याविरोधात रविवारी काँग्रेसने देशभरात सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली असताना वेगवेगळय़ा राज्यातदेखील अशाप्रकारे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादम्यान वेगवेगळय़ा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशात हुकुमशाही पाहायला मिळत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. मुंबई आणि नागपूरमधील आंदोलनात बडे नेते सहभागी झाले होते.
राहुल गांधींनी बदलले ट्विटर प्रोफाईल
सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लगचेच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये मोठा बदल केला आहे. राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईलवर ‘अपात्र खासदार’ असा उल्लेख केला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हा बदल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये आता ‘डिसक्वालिफाईड एमपी’ असे पाहायला मिळत आहे.