ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांसारखे, तर दक्षिण भारतातील लोक आफ्रिकेतल्या लोकांसारखे दिसतात, या सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ते तेलंगणामधील वारंगळ येथे एका प्रचार सभेत भाषण करीत होते. पित्रोदा हे काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांचे सल्लागार आहेत. त्यामुळे काँग्रेस पित्रोदांच्या विधानांवर हात झटकून मोकळी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.
पित्रोदा यांनी त्यांच्या विधानामुळे समस्त भारतीयांचा अपमान केला आहे. या अपमानाची किंमत काँग्रेसला भोगावी लागल्यावाचून राहणार नाही. भारतीय नागरीक काँग्रेसला कधीही क्षमा करणार नाहीत. पित्रोदा यांच्या या विकृत आणि उपमर्दकारक विधानामुळे व्यक्तीश: मी अत्यंत संतप्त झालेलो आहे. माझ्या भावनेशी भारतातील सर्व नागरीक समरस आहेत. पित्रोदा यांच्या विधानावर काँग्रेसच्या शहजाद्यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल, असा घणाघात त्यांनी केला आहे.
विरोधाचे कारण उलगडले
भारतीय जनता पक्षाने ज्यावेळी आदीवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी केली, त्यावेळी काँग्रेसने त्यांना प्रचंड विरोध केला. इतक्या टोकाच्या विरोधाचे कारण काय, याचा मी तेव्हापासून विचार करीत होतो. त्याचे कारण आज पित्रोदा यांच्या विधानामुळे उलगडले आहे. काँग्रेस भारतीयांना भारतीय मानतच नाही. ज्यांचा रंग काळा आहे, त्यांचा संबंध काँग्रेसच्या दृष्टीकोनातून आफ्रिकेच्या लोकांशी असतो. काळ्या रंगाचे लोक मूळचे भारतीय असू शकतात, हे काँग्रेसला अमान्य आहे. या भावनेतूनच या पक्षाने मुर्मू यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला होता, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसकडून लोकांची फसवणूक
राज्याची सत्ता हाती येताच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. त्यामुळे तेलंगणाच्या लोकांनी त्यांना सत्ता दिली. आता या पक्षाने हे आश्वासन भिजत ठेवलेले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ते पूर्ण करण्यात येईल असे हा पक्ष म्हणत आहे. याचाच अर्थ, या पक्षाने लोकांची दिशाभूल करुन त्यांची मते मिळविली आहेत, असा होतो. अशा पक्षाचा पराभव येथील सूज्ञ मतदार करतील, असा विश्वास त्यांनी भाषणात व्यक्त केला.