प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन,तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने गुरुवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. राजा छत्रपती चौकात रास्ता रोको करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध करणारी भाषणे झाली. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. यानंतर हा मोर्चा तहसीलदार कार्यालयात नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणा देऊन पुन्हा निषेध करण्यात आला.
यावेळी उपतहसीलदार बिद्री यांनी निवेदनाचा स्वीकार केला. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोली, जॅकी फर्नांडिस, महांतेश राऊत, लक्ष्मण मादार, गुड्डुसाब टेकडी, अनिता दंडगल यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.