‘तरूण भारत‘चे निवासी संपादक मनोज साळुंखे यांचे मत : वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त शहरात वृत्तपत्र वाचन प्रेरणा दिंडी : पालखी खांद्यावर घेत वृत्तपत्र विक्रेत्यांनी केला वाचन जागर
प्रतिनिधी/कोल्हापूर
इंटरनेटच्या क्रांतीनंतर झालेला माहितीचा विस्फोट आणि अलिकडच्या काळामध्ये डींजिटल युगातील नवमाध्यमांतून वेगाने येणाऱया माहिती आणि बातम्यांवर दृष्टीक्षेप टाकल्यास आजही वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱया माहिती, बातम्यांवरच समाजमनाचा विश्वास आहे. डीजिटल युगातही विश्वासार्हता हाच वृत्तपत्रांचा कणा आहे. त्यामुळे यापूर्वी शेकडो वर्षांपासून मुद्रित माध्यमांसमोर विविध प्रकारची कितीही संकटे आली तरीही ती आपले अस्तित्व टिकवून आहेत. ते यापुढे टिकवून ठेवतील, असा विश्वास ‘तरुण भारत’चे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी व्यक्त केला.
वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून आयोजित वाचन प्रेरणा दिंडीच्या सांगता समारंभात निवासी संपादक साळुंखे बोलत होते. ऐतिहासिक बिंदू चौकात हा सांगता सोहळा झाला. दरम्यान ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळय़ास अभिवादन करून या दींडीला प्रारंभ झाला. याप्रसंगी पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
नवतंत्रज्ञान वापराचा अतिरेक नको
निवासी संपादक साळुंखे पुढे म्हणाले, कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाला विरोध असण्याचे कारण नाही. नवतंत्रातून होणारे चांगले बदल हे मानवी जातीसाठी वरदान आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक ठरतो. ज्ञान, माहिती, मनोरंजनाचा सोशल मीडियात स्फोट झाला आहे. वृत्तापत्रातील बातमी आणि माहितीचा प्रवास अनेक टप्प्यातून होतो. बातमीच्या विश्वासार्हतेची प्रत्येक टप्प्यांवर तपासणी होते. या उलट सोशल मीडिया अनिर्बंध आहे. परिणामी सोशल मीडियातून मिळणाऱया उलट सुलट माहिती आणि बातम्यांमुळे वाचकही चक्रावला आहे. परिणामी आजही वाचकांना खात्रीसाठी वृत्तपत्राचाच आधार घ्यावा लागतो. ही गोष्ट अनके सर्व्हेक्षणातून सिद्धही झाले आहे. हीच वृत्तपत्रांची ताकद आणि यश आहे.
निवासी संपादक साळुंखे म्हणाले, कोरोनासारख्या संकटातही वृत्तपत्रातील बातमीची विश्वासार्हता कमी झालेली नव्हती. बातमी कितीही चांगली लिहीली तरी तीच बातमी वृत्तपत्ताच्या माध्यमातून घरोघरी पोहचवण्याचे काम विक्रेते करतात. वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त काढण्यात आलेली वाचन प्रेरणा दिंडी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यांच्या सचोटीमुळेच वृत्तपत्रे घराघरात पोहचतात. सोशल मीडियाचा योग्य वापर करत युवा पिढीसह समाजातील प्रत्येक घटकाने वाचनाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, असे सांगत निवासी संपादक साळुंखे यांनी वृत्तपत्र विकेत्यांच्या कल्याणकारी महामहामंडळाच्या स्थापनेसाठी ‘तरुण भारत’ परिवारासह इतर वृत्तपत्रेही सहकार्य करतील, अशी ग्वाही दिली. यावेळी सकाळचे कार्यकारी संपादक निखील पंडीतराव, लोकमतचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, पुण्यनगरीचे निवासी संपादक राजकुमार चौगुले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
घरोघरी वृत्तपत्र वाचन संकल्पनेसाठी प्रयत्न : रघुनाथ कांबळे
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे म्हणाले, सोशल मिडियावर तरूण पिढी गुरफटत चालली आहे. या मोबाईल वापरण्याचे प्रमाण कमी करून, घरोघरी वृत्तपत्र वाचन व्हावे, ही संकल्पना वाढवण्यासाठी वृत्तपत्र विक्रेते प्रयत्नशील आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. सर्वच दैनिक वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी राहतील, अशी अपेक्षा आहे.
वृत्तपत्र विपेत्यांसाठी कल्याणकारी महामंडळ हवे : शिवगोंड खोत
पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवगोंड खोत म्हणाले, विक्रेता संघटनांना संरक्षण मिळाले पाहिजे. वृत्तपत्र विक्रेता 358 दिवस काम करतो तरी त्यांना सरकारने कल्याणकारी योजना दिलेली नाही. वृत्तपत्र विपेत्यांच्या कल्याणकारी महामंडळाच्या लढय़ाला सर्व दैनिकांनी सहकार्य करावे. संघटनेचे संचालक आण्णासो गुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
ऐतिहासिक दसरा चौकात रॅलीला सुरूवात
दसरा चौकातून रॅलीला सुरूवात झाली. व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज, कॉमर्स कॉलेजमार्गे बिंदू चौकात या दिंडीची सांगता झाली. जिल्हय़ातील सर्व दैनिकांचे संपादक व वितरण विभागाचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष किरण व्हनगुते, महानगर वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष रवी लाड, संघटक शंकर चेचर, महालक्ष्मी वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष केदार पाटील, संघटक सुभाष औंधकर, कावळा नाका डेपोचे किसन शहापुरे, सुंदर मोरे, राजारामपुरी डेपोचे अध्यक्ष प्रफुल्ल कोतमीरे, सुनील खोत, रमेश जाधव, सतिश दिवटे, अंकुश परब, रणजित आयरेकर, सागर रुईकर, सुरेंद्र चौगुले, सुरेश ब्रम्हपुरे, इंद्रजित पोवार, समीर कवटेकर, प्रकाश शिंदे, परशराम सावंत, राजाराम पाटील, बजरंग पाटील आदी उपस्थित होते.