प्रतिनिधी /बेळगाव
सलग तीन दिवस सुटीमुळे बँका बंद होत्या. त्यामुळे बुधवारी बँका सुरू होताच ग्राहकांची मोठी गर्दी झाली. धनादेश, आरटीजीएस यासह विविध सेवांसाठी नागरिक बँकांमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे तीन दिवसांनंतर मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे दिसून आले.
रविवार दि. 1 रोजी साप्ताहिक सुटी, सोमवारी रमजान ईद तर मंगळवारी जगद्ज्योती बसवेश्वर जयंती असल्याने सलग तीन दिवस बँकांसह सर्वच सरकारी कार्यालये बंद होती. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होते. या काळात नागरिकांना चलन मिळण्यासाठी एटीएमवर अवलंबून रहावे लागले. शहराच्या मध्यवर्ती भागातील एटीएमवर भार पडल्यामुळे खणखणाट होता. त्यामुळे बँका केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा ग्राहकांना होती. बुधवारी सकाळी बँका उघडण्यापूर्वीच नागरिकांची गर्दी झाली होती. पेन्शन तसेच पगार 1 तारखेपासून बँक खात्यात जमा होतात. ते काढण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. बुधवारी शहरातील मुख्य बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. बँकांसोबतच को-ऑप. सोसायटय़ांमध्येही ग्राहकांची गर्दी असल्याचे दिसून आले.