काही भागात वळिवाची हुलकावणी, येत्या दिवसात येणार मशागतीच्या कामांना जोर
बेळगाव : मागील पंधरा-वीस दिवसात तालुक्यातील विविध गावांमध्ये कमी-जास्त प्रमाणात वळिवाचा पाऊस झाला. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ होणार आहे. काही भागात अद्याप जोरदार वळिवाची प्रतीक्षा आहे. तर काही भागात समाधानकारक वळीव बरसला आहे. त्यामुळे मशागतीची कामे सुरू होणार आहेत. मागील पावसाळ्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रब्बी हंगामातदेखील पेरणी सुरळीत झाली नव्हती. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या दिवसात मशागतीच्या कामांना जोर येणार आहे. त्याबरोबर बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांची मागणी वाढणार आहे. कृषी खात्याकडून बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून दिली जातात. मात्र, यामध्ये अनावश्यक बी-बियाणांचा भरणा अधिक असतो. त्यामुळे स्थानिक शिवारात लागणारीच बी-बियाणे आणि खते उपलब्ध करावीत, अशी मागणीही शेतकऱ्यांतून होत आहे. तालुक्यातील उचगाव, बेळगुंदी, बेळवट्टी, बडस, बिजगर्णी, आंबेवाडी, अलतगा, कडोली, होनगा यासह पूर्वभागातही वळिवाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांकडून बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी, त्याबरोबर ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागतीची कामे केली जात आहेत. शिवाय शेतात शेणखत देखील टाकले जात आहे. एकूणच येत्या दिवसात पेरणीपूर्व मशागतीची वर्दळ शिवारात पहावयास मिळणार आहे. मे अखेरीस धूळवाफ पेरणीला प्रारंभ होतो. तत्पूर्वी शेतीची मशागत होणे आवश्यक आहे. यासाठी वळिवाचा पाऊस झाल्यानंतर शेतकरी शेतीकामाकडे वळतात.
काही भागात जोरदार वळिवाची प्रतीक्षा
एप्रिल महिन्यात काही भागात समाधानकारक वळीव झाला असला तरी अद्याप काही भागात जोरदार वळिवाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. मागील पंधरा दिवसात केवळ किरकोळ पाऊस बरसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून मोठ्या वळिवाची अपेक्षा व्यक्त होत आहे.