पुणे / प्रतिनिधी :
पुणेकरांना स्वतःच्या मालकीच्या घराच्या घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. ही सवलत आता रद्द करण्यात आल्याच्या पुणेकरांना नोटीसा आल्या असल्याकडे लक्ष वेधत याविरोधात पुण्यातील काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संजय बालगुडे यांनी “दादा पुणेकरांना वाचवा”, असे म्हटले आहे. बालगुडे यांच्या या पत्रामुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.
बालगुडे यांनी काय म्हटंलय पत्रात?
पुण्यातील नागरिकांना 1970 सालापासून स्वतः च्या मालकीच्या घरात राहात असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. 2011 मध्ये महालेखा परिक्षकांनी याबाबत नोंदवला होता. पुणे महापालिकेच्या गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या अनेक निर्णयांबाबतही आक्षेप नोंदवला होता. याचाच आधार घेऊन 2018 मध्ये तुमचे सरकार असताना व तत्कालीन मुख्यमंत्र्याच्याकडे नगर विकास खाते असताना एक अध्यादेश काढण्यात आला. या अध्यादेशानुसार 1900 सालापासून पुणेकरांना मिळणारी घरपट्टीतील सवलत रद्द करण्यात आली आहे. केवळ सवलतच रद्द केली नाही, तर सन 2018 पर्यंत मिळालेली सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसूल करा, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आपण वारंवार आश्वासन देऊनही आता पुणेकरांना नोटीस येऊ लागल्या आहेत. 40 टक्के सवलत पुणेकरांना मिळाली पाहिजे. चंद्रकांतदादा आपण पालकमंत्री असून आपण पुणेकरांना वाचवा, असे या पत्रात म्हटले आहे.
अधिक वाचा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता असताना वसुली व व्याज घेण्यावर स्थगिती द्यावी, असा ठराव करून सरकारकडे पाठविला. याबाबत आपण पुन्हा मंत्री झाल्यावर आपल्याला याबाबत विचारले असता, या वसुलीलाच्या अध्यादेशाला स्थगिती देऊन पुणेकरांना दिलासा देऊ, असे आपण जाहीर सांगितले होते. पण अद्याप याबाबत शुद्धीपत्रक शासनाने पाठवलेले नाही, असे मनपा आयुक्तांनी कळवले आहे. सामान्य पुणेकर हा घरपट्टीच्या ओझ्याखाली दबून गेला आहे. त्यामुळे आपण आत्ता लक्ष देऊन पुणेकरांना वाचवले पाहिजे, असेही यावेळी बालगुडे यांनी म्हटले आहे.