यंदाचा फेब्रुवारी हा गेल्या 147 वर्षांतील सर्वांत उष्ण महिला ठरला असतानाच मार्च, एप्रिल व मे तीनही महिने तापदायक ठरण्याचा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज म्हणजे यंदाचा उन्हाळा उच्चांकी ठरण्याचीच चिन्हे म्हणावी लागतील. पावसाळा, हिवाळा व उन्हाळा हे भारतातील प्रमुख तीन ऋतू. फेब्रुवारी ते मे हा उन्हाळय़ाचा हंगाम. परंतु, उन्हाळय़ाची खरी तीव्रता जाणवते, ती होळीच्या आसपास. या वर्षीचे वैशिष्टय़ म्हणजे होलिकोत्सवाच्या वीस ते पंचवीस दिवस आधीच सर्वदूर दाह जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे नेहमीपेक्षा उन्हाळा लवकर सुरू झाला, अशीच भावना सर्वसामान्यांमध्ये नांदत होती. आता आयएमडीने सरता महिना 147 वर्षांतील सर्वांत दाहक ठरल्याचे जाहीर केल्याने त्यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. यापूर्वी 1877 मध्ये फेब्रुवारीत सर्वाधिक कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. आता जवळपास दीड शतकानंतर पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. घटलेली चक्रीवादळांची संख्या, परिणामी मर्यादित झालेला पाऊस ही त्यामागची कारणे सांगितली जातात. अर्थात याचा अधिक सखोल अभ्यास होणे आवश्यक होय. मागच्या चार ते पाच दिवसांचा विचार केला, तर महाराष्ट्र, कर्नाटकसह देशाच्या विविध भागांत उन्हाचे चांगलेच चटके जाणवू लागल्याचे दिसून येते. आत्ताच इतकी दाहकता असेल, तर पुढच्या अडीच महिन्यांतील वातावरण कसे राहणार, हा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. मार्च ते मे यादरम्यान गुजरात ते पश्चिम बंगाल पट्टय़ात उष्णतेच्या लाटा धडकण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शिवाय या कालावधीत देशात सर्वत्रच सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये कमालबरोबरच किमान तापमानही चढे राहू शकते. ईशान्य भारतासह पूर्व आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असून, मध्य भारताला उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. मागच्या वर्षीचा म्हणजेच 2022 चा मार्च महिना 121 वर्षांतील सर्वांत अधिक उष्ण ठरला होता. या काळात मासिक सरासरी तापमान 33.1 इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर मागच्या एप्रिल महिन्यातही असाच उच्चांक प्रस्थापित झाला. या वर्षीही हाच ट्रेंड कायम राहण्याची लक्षणे आहेत. हे बघता यंदाचा संपूर्ण उन्हाळा कसोटीचा राहणार, हे लक्षात घेतले पाहिजे. उन्हाळा आणि पाणीटंचाई हे समीकरण मानले जाते. या वर्षीचा उन्हाळा अधिक तीव्र राहणार असेल, तर पाणीटंचाईची तीव्रताही गृहीत धरायला हवी. यंदा अनेक भागांत चांगले पाऊसमान राहिल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला. ऑक्टोबर हिटला मिळालेल्या फाटय़ामुळे पाण्याचे मोठे बाष्पीभवनही टळले. तथापि, लवकर सुरू झालेल्या उन्हाळय़ाचा जलसाठय़ावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पाण्याची काटकसर आवश्यक ठरते. जलवाहिन्यांची गळती हा अत्यंत गंभीर विषय होय. अशा गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होतोच. त्याचबरोबर कमी दाबाने पुरवठा झाल्याने कितीतरी नागरिकांना पुरेशा पाण्यापासून वंचित राहावे लागते. याकरिता पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्यांची वेळच्या वेळी दुरुस्ती करण्यास प्राधान्य द्यायला हवे. काही भागांत मुबलक पाणी असते. परंतु, नागरिक काटकसरीने पाणी वापरताना दिसत नाहीत. पाणी हे जीवन आहे, असे आपण म्हणतो. त्यातच पाण्याचे महत्त्व अधोरेखित होते. त्याचा जपून वापर करण्याकडेच सगळय़ांचा कल असायला हवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी शिळे झाल्याच्या समजुतीने होणारे नुकसान. वास्तविक पाणी कधीही शिळे होत नाही. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनीही याबाबत जनजागरण करण्यावर भर द्यायला पाहिजे. आजमितीला वेगवेगळय़ा राज्यांमध्ये शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत कूपनलिकांचेही जाळे बघायला मिळते. धरणांतून वा उपलब्ध स्रोतांतून होणारा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने या कूपनलिकांवरील अवलंबित्व तसे जागोजागी मोठेच. तथापि, मार्च-एप्रिलऐवजी या बोरवेल जानेवारी-फेब्रुवारीपासूनच कुंथत असतील, तर पुढच्या काही दिवसांत काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना न केलेलीच बरी. कडक उन्हाळय़ाबरोबरच भूगर्भातील प्रचंड उपसा, हेही त्यामागचे कारण. एकीकडे उपसा करण्याकरिता सैल हात सोडायचा. मात्र, पाणी जिरविण्याकरिता व जलपनुर्भरणाकरिता कोणतेही प्रयत्न करायचे नाहीत, ही आता मानसिकताच बनली आहे. ती बदलावी. शहरी सुशिक्षित एक इंचही मातीची जमीन खुली सोडणार नसतील, तर पाणी कसे व कुठे मुरणार, हा आजचा मोठा प्रश्न. या पातळीवरही आत्तापासूनच काम झाले नाही, तर पाण्याचा प्रश्न भविष्यात अतिशय बिकट होऊ शकतो. देशातील कितीतरी नागरिक आजही दुर्गम भागात वा खेडोपाडी राहतात. त्यांना मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागते. पाण्यासाठी तर मैलोन् मैल वणवण करावी लागते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही हे चित्र बदललेले नाही. आगामी काळात तरी त्यांची या दुष्टचक्रातून मुक्तता व्हावी. अत्युच्च तापमानाचा काळ हा आरोग्यासाठी नाजूकच मानला जातो. त्या दृष्टीने केंद्राने दिलेल्या गाईडलाईन पाळाव्या लागतील. भरपूर पाणी, ताजी फळे, लिंबू पाणी, ओआरएससह हलका व सात्त्विक आहार घेण्याकडे प्रत्येकाचा कल असायला हवा. उष्णतेच्या लाटांचा गहू, तेलबिया, हरभऱयासह काही पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती संभवते. ऐन काढणीला आलेली पिके लाहीमुळे होरपळू शकतात. स्वाभाविकच चलनवाढीचा दर नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांना खिळ बसून महागाई आणखी वाढण्याचा धोका आहे. विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवून सर्वसामान्यांना सरकारने चांगलाच झटका दिला आहे. मागच्या आठ वर्षांत सिलिंडरचा दर 450 वरून तब्बल 1100 रुपयांवर पोहोचला आहे. त्या अर्थी सामान्य माणूस सध्या गॅसवरच आहे, असे म्हणता येईल. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचे हप्तेही वाढले आहेत. जीवनावश्य वस्तूंच्या दरातही मोठी वाढ झाल्याने महागाईच्या चक्रव्यूहात जनता अडकल्यासारखी स्थिती आहे. उन्हाचे आणि महागाईचे हे चटके सोसत पुढे जाणाऱया जनतेला आता थंडाव्याची प्रतीक्षा आहे.
Previous Articleबांदोडा येथे काजूच्या बागायतीला आग 2 लाखाची हानी
Next Article बांधकाम क्षेत्रातील मजुरांना ई श्रम कार्डखाली आणणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.