तरुण भारत वृत्ताची घेतली दखल : शेतकऱ्यांना दिलासा : पिकांना पाणी देणे झाले सुलभ
वार्ताहर /किणये
बिजगर्णी, बेळगुंदी, कावळेवाडी, बेळवट्टी या भागात रात्रीच्यावेळी थ्री फेज वीजपुरवठा देण्यात येत होता. यामुळे शेतकऱ्यांना रात्री शिवारात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत होते. रात्रीच्यावेळी वीजपुरवठा देऊनही तो सुरळीत नव्हता. यामुळे शेतकरी संतापले होते. तसेच रात्रीचा वीजपुरवठा हा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ ठरणारा आहे. या भागात दिवसा थ्री-फेज वीजपुरवठा देण्यात यावा. याबाबत ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातून आवाज उठविण्यात आला. दोन दिवसापूर्वी बिजगर्णी, बेळगुंदी भागातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. अखेर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेऊन बिजगर्णी, बेळगुंदी, कावळेवाडी, बेळवट्टी या भागात दिवसा वीजपुरवठा सुरू केला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. पावसाअभावी पिके सुकून गेली आहेत. बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त बनला आहे. यामुळे शेतशिवारातील पिकांना शेतातील विहिरी व कूपनलिकेचे पाणी शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे. बिजगर्णी, बेळवट्टी भागात रात्रीच्यावेळी थ्री-फेज वीजपुरवठा देण्यात येत होता. तोही अनियमित व अपुरा यामुळे या भागातील शेतकरी वर्ग वैतागून गेले होते. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी बिजगर्णी, बेळगुंदी भागातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच गेल्या दोन दिवसांपासून या भागात दिवसा थ्री-फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता शिवारातील पिकांना दिवसा पाणी देता येणार आहे. साहजिकच शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
सहकार्य करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
बिजगर्णी, कावळेवाडी, बेळगुंदी, बोकनूर, इनाम बडस, राकसकोप, यळेबैल, सोनोली या भागात सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 तीन दिवस व त्यानंतर दुपारी 1.30 ते सायंकाळी 6.30 तीन दिवस व त्यानंतर रात्री 11 ते पहाटे 4 तीन दिवस याप्रमाणे या भागात थ्री-फेज वीजपुरवठा देण्यात येत आहे, अशी माहिती उचगाव विभागीय कार्यालयाचे मुख्यअधिकारी सचिन मोहन यांनी दिली आहे. तसेच सध्या वीज उत्पादन कमी होऊ लागले आहे. यामुळे काही कालावधीसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असेही अधिकारी सचिन यांनी सांगितले.