विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी खालावली : हिरव्या पालेभाजांच्या मागणीत वाढ
बेळगाव : नदी, विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाल्याने यंदा उन्हाळी भाजीपाला लागवडीत घट झाली आहे. विशेषत: उन्हाळ्यात कोबी, फ्लावर, कोथिंबीर, भेंडी, वांगी, मिरची आदींची लागवड केली जाते. मात्र यंदा पाणीपातळी खालावल्याने लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे येत्या दिवसांत भाजीपाला उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील काही भागात उन्हाळी भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नदी, विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळी खालावली आहे. परिणामी पिकांना पाणी मिळणे अशक्य होऊ लागले आहे. याचा परिणाम भाजीपाला लागवडीवर होत आहे. विशेषत: आंबेवाडी, अलतगा, जाफरवाडी, कडोली, अगसगे, हंदिगनूर, मण्णिकेरी, केदनूर, होनगा, काकती आदी भागात लागवडीचे प्रमाण घटले आहे.
बहुतांश भागात वळीवची हुलकावणी
वाढत्या उन्हामुळे हिरव्या पालेभाज्यांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे दरही चढेच आहेत. त्यातच यंदा वाढत्या उष्म्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे एकूण भाजीपाला लागवडीत घट होताना दिसत आहे. अलिकडे उन्हाळी बटाटा लागवडही कमी झाली आहे. त्या जागी ऊस लागवडीच्या प्रमाणात वाढ झाले आहे. उन्हाळी हंगामात कोथिंबीर, वांगी, भेंडी, ओली मिरची, कोबी आणि फ्लावर लागवडीवर अधिक भर दिला जातो. मात्र यंदा पाण्याचा तुटवडा सर्वत्र जाणवू लागला आहे. त्याबरोबर वळीव पावसानेही काही भागात हुलकावणी दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. याचा परिणाम यंदाच्या उन्हाळी भाजीपाला लागवडीवरही होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.