प्रतिनिधी /वास्को
जोरदार वाऱया पावसामुळे कासावलीतील मार्गावर कोसळलेला माड हटवला गेला नसल्याने या मार्गावर अपघातांचा धोका निर्माण झालेला आहे. हा माड एखादा अपघात घडण्यापूर्वीच हटवण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पाऊस व जोरदार वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी भिंतीही कोसळल्याने लोकांना नुकसानी सोसावी लागली. या पावसामुळे बऱयाच ठिकाणी रस्त्यांचीही वाताहात झाल्याने वाहतुकीला धोका निर्माण झालेला आहे. जोरदार वाऱयामुळे कोसळलेले वृक्ष त्वरीत हटवण्याचे काम अग्नीशामक दलाने आतापर्यंत पार पाडलेले आहे. मात्र, पाले कासावली येथील मुख्य रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी एक माड उन्मळून पडला होता. हा माड त्या ठिकाणाहून हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीसमोर धोका निर्माण झालेला आहे. सकाळ संध्याकाळ या महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्यावेळी पाऊस व वाऱयामुळे रस्त्यावरील हा माड दृष्टीस पडत नाही. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधितांनी हा माड त्वरित हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी होत आहे.