वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
शासनाने लाखो रुपये खर्चून उभारलेला येथील ग्रा.पं. कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरील बसथांबा प्रवासीवर्गासाठी कुचकामी ठरला आहे. ग्रा. पं. पदाधिकाऱयांनी या समस्येकडे लक्ष देऊन बसथांब्याची दुरुस्ती करून प्रवासीवर्गाला दिलासा देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कंग्राळी बुद्रुक गावचा पाच वर्षांपूर्वी स्मार्ट व्हिलेज स्किममध्ये समावेश झाला आहे. येथील बसच्या प्रतीक्षेत असणाऱया प्रवासीवर्गाला उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने शासनाने ग्रामीण भागामध्येही स्मार्ट बसथांबे उभारून चांगली सोय केली आहे. परंतु बरेच बसथांबे प्रवाशांपेक्षा इतर नागरिकांनी व्यापलेले असतात. यामुळे या बसथांब्यांचा उपयोग कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बसथांब्याची दैनावस्था ग्रा.पं. कार्यालयानजीक असणाऱया या स्मार्ट बसथांब्याची अवस्था दयनीय झाली आहे. दोन वर्षांपासून या ठिकाणी मोडलेले आसन तसेच भिंती व कोपरे समाज कंटकांकडून स्टार-गुटखा खाऊन रंगविले आहेत. यामुळे बसथांब्यामध्ये नाक मुठीत धरून थांबावे लागते. या बसथांब्यावर रिकामटेकडे अधिक संख्येने असतात. ते स्टार-गुटखा खाऊन दुर्गंधी पसरवतात. ग्रा.पं.ने पाळत ठेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे असल्याची संतापजनक प्रतिक्रिया प्रवासी व विद्यार्थीवर्गातून व्यक्त होत आहे.