सर्वोच्च न्यायालयात सिब्बलांची याचिका ः प्रदर्शन रोखण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘द केरळ स्टोरी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि वकील निजाम पाशा यानी चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
चित्रपटाचा ट्रेलर आतार्पंत 1.6 कोटीवेळा पाहिला गेला आहे. चित्रपटात आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे, हा चित्रपट म्हणजेच ऑडिओ-व्हिज्युअल प्रोपेगेंडा असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल आणि निजामा पाशा यांनी न्यायाधीश के.एम. जोसेफ आणि बी.व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर केला होता.
अनेक प्रकारे द्वेषपूर्ण भाषणं होत असतात. या चित्रपटाला सर्टिफिकेशन मिळाले आणि बोर्डाने मंजुरी दील आहे. हा चित्रपट म्हणजे एखादा व्यक्ती व्यासपीठावर चढून अनियंत्रित भाषण करण्याचा प्रकार नव्हे. जर तुम्हाला चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान द्यायचे असल्यास योग्य पद्धतीने चित्रपटाच्या सर्टिफिकेशनला द्यावे असे खंडपीठाने म्हटले आहे. यावर सिब्बल यांनी जे आवश्यक असेल ते करू असे सांगितले.
याचिकाकत्यांने प्रथम उच्च न्यायालयाकडे दाद मागायला हवी होती अशी टिप्पणी न्यायाधीश नागरत्ना यांनी केली. चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार असल्याने आता फारसा वेळ शिल्लक नसल्याचा युक्तिवाद पाशा यांनी केला. हे काही रिकामी मैदान नव्हे, अन्यथा प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ लागेल असे खंडपीठाने पाशा यांना उद्देशून म्हटले आहे. यावर आम्ही द्वेषपूर्ण वक्तव्यांप्रकरणी हस्तक्षेप अर्ज दाखल केला असल्याचे खंडपीठासमोर म्हटले. याचिकेवर आम्ही सल्ला देत नसलो तरीही योग्य उपायाच्या शोधात एक ठोस रिट याचिका दाखल करण्याची गरज असल्याची टिप्पणी न्यायाधीश जेसेफ यांनी केली आहे.
चित्रपटावरून वाद का?
‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी काँग्रेसकडून या चित्रपटाला विरोध दर्शविण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हिंदू युवतींचे बेनवॉश करत त्यांचे धर्मांतर घडवून आणले जात असल्याचे दर्शविण्यात आले आहे. चित्रपटानुसार 32 हजार हिंदू युवतींचे धर्मांतर घडवून आणत त्यांना इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील करविण्यात आले होते.
बंदीची मागणी नाही ः थरूर
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मी करत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो म्हणूनच मूल्यवान राहू शकत नाही असे थरूर यांनी म्हटले आहे.
केरळ सरकारचा विरोध
चित्रपटाच्या प्रदर्शनावर थरूर यांच्या उलट केरळ काँग्रेसने भूमिका घेतली आहे. या चित्रपटाचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर केरळची प्रतिमा मलीन करणे असल्याचे स्पष्ट असल्याचे काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन यांनी म्हटले आहे. तर चित्रपट जाणूनबुजून सांप्रदायिक ध्रूवीकरणाच्या उद्देशाने आणि केरळविरोधात द्वेष फैलावण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला आहे.